दिनांक १४ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
नगर विकास, ऊर्जा व आदिवासी विकास मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी बांधव व वीज वितरण कंपनी संदर्भात असलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी बाबत आज आढावा बैठक घेतली.
यावेळी (माजी मंत्री व आमदार) बबनराव पाचपुते, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी कारखान्याचे (चेअरमन) राजेंद्र नागवडे, (राज्य साखर संघाचे संचालक) घनश्याम आण्णा शेलार, पंचायत समितीच्या (सभापती) पाडळे ताई प्रभारी (प्रांत अधिकारी) स्वाती दाभाडे मॅडम, राष्ट्रवादीचे नेते हरिदास (आबा) शिर्के, (तहसीलदार) मिलिंद कुलथे, (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, राजेंद्र आबा म्हस्के, आदिवासी संघटनेचे अजित भोसले व मंगेश घोडके यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व पीडित आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नां संबंधात मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या विविध अडचणी व सादर केलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करून, विषय मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज रोहित्र व वीज पुरवठा बाबत वेगवेगळ्या तक्रारी व निवेदने देण्यात आली होती. त्या निवेदनांच्या अनुशंगाने वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांच्यात संवाद साधत, त्यांच्या अडचणी सोडवण्याचे व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळेस दिले आहे.
आदिवासी बांधवांच्या आश्रम शाळा तसेच, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षेचे तालुक्यातील केंद्र उभारणीबाबत मागणी करण्यात आली. त्या बाबतीत तनपुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शबरी घरकुल योजना व लिंपणगाव येथील जळीत प्रकरणातील पीडितांचा प्रश्न अभ्यास करून लवकरच मार्गी लावणार असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)

