दिनांक २९ जानेवारी(श्रीगोंदा फॅक्टरी, श्रीगोंदा):
तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथे दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी तुषार वजीरे हा युवक भाजीपाला आणण्यासाठी घरातून बाहेर गेला असता, येथील महाराष्ट्र खानावळी समोर उमेश वेताळ याने मोटरसायकलचा तुषारला कट मारला. यावेळी तुषारने उमेशला गाडी जरा पाहून चालवा असे म्हणाल्यावर उमेश ने तुषारच्या अंगावर मोटरसायकल घालण्याचा प्रयत्न करीत, आम्ही कोण आहोत, माहित आहे का ? असा सज्जड दम दिला.

याबाबत तुषारने त्याच्या घरच्यांना झालेली हकीकत सांगितली. यानंतर साधारण दहा वाजण्याच्या सुमारास तुषारचा भाऊ तेजस हा दवाखान्यात उपचारासाठी जात असताना, उमेश वेताळ व इतर दोन इसमांनी त्यास अडवले. तुषारला समजून सांग असे म्हणाले. तुम्हीच कट मारून त्याला समजावयची भाषा करताय ? असे तेजसने विचारल्यानंतर उमेश वेताळ व त्याच्याबरोबरच्या दोन इसमांना राग अनावर झाला.
यावेळी तलवारीच्या साह्याने तेजसला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तलवारीने केलेल्या मारहाणीमध्ये तेजसच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. लाकडी दांड्याने पाठ व शरीरावर इतर ठिकाणी मोठे व्रण उमटे पर्यंत तेजसला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी काल दिनांक २८ जानेवारी रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून उमेश शिवाजी वेताळ, सुशांत उर्फ सोन्या शामराव गुंजाळ व कमलेश उर्फ कमलाकर शामराव गुंजाळ या तिघांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम व भा.दं.वि. ३०७, ३२६, ३४१, ५०४, ३४ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतर काल पासून फिर्यादी व त्याचे संबंधितांवर अनेकांकडून गुन्हा मागे घेण्यासंदर्भात दबाव टाकण्यात आल्याचे समजते आहे.
स्त्रोत:(श्रीगोंदा पोस्टेला दाखल तक्रार)

