दिनांक २३ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
दिवाळीच्या लक्ष्मीपूजन सणानंतर झोपलेल्या एका व्यापाऱ्याच्या कुटुंबावर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारात अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील रेल्वे गेटजवळ मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली..

या हल्ल्यात व्यापारी बाळासाहेब निकम आणि त्यांच्या पत्नी वैशाली निकम गंभीर जखमी झाले असून, त्यांना दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाळासाहेब निकम हे रेल्वे गेटजवळ फुले व फळे विकण्याचा व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर बाळासाहेब निकम आणि वैशाली निकम हे पती-पत्नी झोपले असताना दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.

झोपेत असलेल्या या दांपत्यावर दरोडेखोरांनी चाकू आणि सत्तूरने सपासप वार केले. या हल्ल्यात बाळासाहेब आणि वैशाली निकम दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.

निकम यांचा मुलगा बापू हे शेजारच्या खोलीत होते. दरोडेखोरांनी बाळासाहेब यांच्या घरातून लक्ष्मीपूजन केलेले सुमारे तीन हजार रुपयांची रोकड लंपास केली. हल्ला केल्यानंतर दरोडेखोर महादेववाडीच्या दिशेने पायी निघून गेले.

गंभीर जखमी झालेल्या निकम दांपत्याला तातडीने दौंड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या दरोड्याचा आणि हल्ल्याचा तपास सुरू केला आहे.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)




Advertise…
