दिनांक २२ ऑगस्ट,श्रीगोंदा :
आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्याला ८ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पीकविमा मंजूर झाला असून त्याचा लाभ तालुक्यातील २० हजार ७३८ शेतकऱ्यांना होणार आहे.
“प्रधानमंत्री फसल बिमा” योजने अंतर्गत रब्बी हंगामातील सन २०१८-१९ ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांसाठी एकूण २० हजार ७३८ शेतकऱ्यांना सुमारे ८ कोटी ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थोड्याच दिवसात वर्ग होणार असल्याची माहिती आमदार पाचपुते यांनी माध्यमांना दिली आहे.
विमा कंपन्यांकडे पिकविम्याची रक्कम भरूनही तालुक्यातील शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा पिकविम्याच्या लाभापासून वंचित होते.यासाठी आमदार पाचपुते हे पीकविमा कंपन्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून, शेतकऱ्यांना विमा मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्यातील २० हजार ७३८ शेतकऱ्यांना ८ कोटी ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला असून, सदरची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पाचपुते यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार !
कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याने, शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला असताना, अशा संकटाच्या काळात आमदार पाचपुते यांनी कोणतीही प्रसिद्धी न करता शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मंजूर करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. शेतकरी अडचणीत असतांना गरजेच्या वेळी पिक विम्याची रक्कम मिळणार असल्याने शेतक-यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
स्रोत:(अनिल वाळके यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
