दिनांक २६ ऑगस्ट, श्रीगोंदा:
शहरात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील मुलीचा विवाह त्यांच्याच नाते संबंधातील अहमदनगर येथील मुलाशी निश्चित करण्यात आला. रित रिवाजाप्रमाणे सर्व पाहुणचार व मानपानाच्या गोष्टी ठरल्या. सुपारीचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी लग्न तिथ निश्चित करत नवऱ्या मुलाला ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच सोन्याची चैन बनविण्यासाठी एक लाख रूपये रोख स्वरूपात देण्यात आले. मात्र, विवाह अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला. अनं..! फोन आला.. नवऱ्या मुलाने भलत्याच पोरीला घेऊन पलायन केलंय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलगी लग्न वयाची झाल्यानंतर तिचा विवाह करण्यासाठी तिच्या आई – वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. श्रीगोंदा कारखाना येथील नातेवाईकांनी अहमदनगर येथील स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलाबाबत लग्नाची बातचीत केली. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम श्रीगोंद्यात पार पडला. मुला मुलीची एकमेकांना पसंती झाली.
त्यानुसार १ नोव्हेंबर २०२० रोजी सुपारीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात नवऱ्या मुलाला ५० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख एक लाख रुपये मुलीच्या वडिलांनी दिले. यानंतर दिनांक ५ जानेवारी २०२१ ही विवाह तिथ काढण्यात आली. मात्र, अचानक मुलाच्या मामाचा फोन आला व त्याने मुलीच्या वडिलांना लग्न मोडल्याचे सांगितले. काय प्रकार झालाय.? समजले नसल्याने.. त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन लावला. यावर मुलाच्या वडिलांनी तुमच्या मुलीचे लग्न आता दुसरीकडे जमवा, आम्ही तुमच्या मुलीला आमच्या घरची सून म्हणून आणणार नाही, जे झाले ते तुमच्या नशिबाने झाले. मुलगा दुसरी मुलगी घेऊन पळून गेलाय असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी वरिष्ठ प्रशासकिय कार्यालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलाच्या घरच्या लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दिनांक १७ ऑगस्ट २१ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अहमदनगर येथील मुलगा, आई, वडील व श्रीगोंदा फॅक्टरी येथील या विवाहाचे मध्यस्थी तसेच, टाकळी/तांदळी, श्रीगोंदा येथील मुलाचे नातेवाईक यांचे विरुद्ध भादवि कलम ४२० व ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
स्रोत:(दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी दाखल फिर्याद)
