दिनांक २ मे २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यांत जल जीवन मिशन अंतर्गत शेकडो कोटी रुपयांची कामं शासकीय योजनेअंतर्गत राबवण्यात येत आहेत. मात्र, योजनेचा उद्देश आणि योजनेची अंमलबजावणी यात जमीन अस्मानाचा फरक निदर्शनास येतोय.
सबंध राज्यात उन्हाची तीव्रता आणि पाण्याची आवश्यकता वाढत असताना.. सर्वसामान्य जनता केंद्रीभूत धरून सरकारने आखलेली ‘जल जीवन मिशन’ हि पाणी योजना उन्हाची झळ कमी करण्यात अपयशी ठरत आहे.. शासन जरी तत्पर असले.. तरी, योजना राबवणारे प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणा मात्र हतबल असल्याचे येथे जाणवत आहे.
लोकांना पाण्याची गरज वाढत असताना श्रीगोंद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉटर सप्लाय यंत्रणा कासवाच्या गतीने काम करीत असून, दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली योजना यंदाच्या उन्हाची काहीली कमी करू शकत नसल्याचे समोरं येतं आहे. त्यामुळे पाण्यासाठी खर्चीलेले कोट्यावधी रुपये पाण्यात तर गेले नाहीत ना..? असा सवाल येथे अधोरेखित केला जात आहे.
एकशे दहा कोटी रुपयांची ‘जल जीवन मिशन’ योजना श्रीगोंदा तालुक्यातील ७९ गावात शुद्ध पाणी.. ‘हर घर जल’ पोहचवण्याची आखलेली योजना पंचायत समितीच्या वॉटर सप्लाय अधिकारी आणि यंत्रणेमार्फत फक्त ७ गावातच कार्यान्वित करण्यात झाली असून, सुमारे ७० गावात नमुद योजना प्रलंबित असल्याने.. श्रीगोंदा तालुक्यातील लाखों लोकं हक्काच्या पाण्यापासून उपेक्षित राहिले आहेत. सदरील योजना यंत्रणेच्या आणि ठेकेदारांच्या सोईनुसार चालू असल्याचे चित्र समोरं येत आहे.
तर, यामुळे एकीकडे योजनेचा उद्देश बाजूला जात, लोकांची तहान भागवण्यासाठी आखलेली “जल जीवन मिशन” योजना सफशेल अपयशी ठरत असल्याचे श्रीगोंदा तालुक्यात जाणवत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ‘जल जीवन मिशन’ योजना राबवणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या कार्याला गती देऊन, योजनेचा ‘अर्थ’पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारावे.. अशी अपेक्षा सामान्य जनता करीत आहे..
स्रोत:(माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती)
