दिनांक २९ मे २०२४, श्रीगोंदा:
कोट्यवधी रुपये खर्चूनही श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य जनता पाण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र या उन्हाळ्यात पाहायला मिळालेले आहे. श्रीगोंदा तालुक्यात राबविण्यात येणारी जल जीवन मिशन योजना, प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदारांच्या मिली भगत कारभारामुळे घशाला कोरड पडलेल्या तालुक्यातील जनतेची तहान भागू शकली नसल्याने.. श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावातील पिडीत नागरिक जल जीवन मिशन योजनेचे काम करणारे ठेकेदार आणि अधिकारी यांचा निषेध करत आहेत. तर, अनेक गावात अपूर्ण व योजनेपासून वंचित असणारे ग्रामस्थ व नागरिक पंचायत समितीच्या अधिकारी अनं ठेकेदार यांच्यावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सबंध राज्यात उन्हाची तीव्रता आणि पाण्याची आवश्यकता वाढत असताना.. सर्वसामान्य जनता केंद्रीभूत धरून सरकारने आखलेली ‘जल जीवन मिशन’ पाणी योजना उन्हाची झळ कमी करण्यात अपयशी ठरत आहे.. शासन जरी तत्पर असले.. तरी, योजना राबवणारे प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणा मात्र हतबल असल्याचे श्रीगोंदा तालुक्यात निदर्शनास येत आहे.
या उन्हाळ्यात लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज वाढत असताना श्रीगोंद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉटर सप्लाय यंत्रणा कासवाच्या गतीने काम करीत असून, दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली योजना यंदाच्या उन्हाची तीव्रता कमी करू शकत नसल्याचे समोरं येतं आहे. त्यामुळे पाण्यासाठी खर्चीलेले कोट्यावधी रुपये पाण्यात तर गेले नाहीत ना..? असा सवाल येथे उपस्थीत केला जात आहे.
एकशे दहा कोटी रुपयांची ‘जल जीवन मिशन’ योजना श्रीगोंदा तालुक्यातील ७९ गावात शुद्ध पाणी.. ‘हर घर जल’ पोहचवण्याची आखलेली योजना आहे. हि पंचायत समितीच्या वॉटर सप्लाय अधिकारी आणि यंत्रणेमार्फत काही गावातच कार्यान्वित करण्यात झाली असून, सुमारे ७० पेक्षा जास्त गावांत नमुद योजना प्रलंबित असल्याने.. श्रीगोंदा तालुक्यातील लाखों लोकं हक्काच्या पाण्यापासून उपेक्षित राहिले आहेत. सदरील योजना प्रशासकीय यंत्रणेच्या आणि ठेकेदारांच्या सोईनुसार चालू असल्याचे चित्र समोरं येत आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, कामामध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात अडचणी असून, आम्ही प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. लवकरच योजना पूर्ण करून पाणी पुरवठा करण्यात येईल.. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात श्रीगोंदा पंचायत समितीचे वॉटर सप्लाय अधिकारी भोसले हे तालुक्यातील बहुतांश गावात जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा व व्यवस्थापन करण्यास अकार्यक्षम ठरल्याचे स्पष्ट होत आहे. तर, अनेक गावातील नागरिकांनी योजनेच्या कामांना गती देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)
