दिनांक २४ मार्च मुंबई :
जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून,प्रशासन सध्या याला अटकाव करण्यासाठी सर्व खबरदारी घेत आहे. चीन आणि इटलीमध्ये या विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू झाला असल्यामुळे संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी घरा बाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
खूपच गरज असेल तरच बाहेर पडावे. अन्यथा, घरातूनच आपले कामकाज करावे. देशावर गंभीर परिस्थिती आली असून,सर्वांनी मिळून याचा सामना करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जगात कोरोना विषाणूने हजारो लोकांचा मृत्यू झाला असून,लाखो लोकांना याची बाधा झाली आहे.
चीनच्या हुयान शहरातून आलेल्या या विषाणूने भारतासह १६० देशात प्रवेश केला आहे. या विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद इटली देशात झाली आहे. संक्रमित रुग्ण बरे झाल्याचेही समोर येत आहे. हा विषाणू रोखण्यासाठी जे पाऊल सरकार उचलत आहे.ते पाहता सर्वसामान्य लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, काही उत्साही नागरिक ढोल, ताट, वाट्या घेऊन घोळक्याने रस्त्यावर उतरून आनंद उत्सव साजरा करताना दिसत होते.
शासनाने केलेल्या दिवसभराच्या मेहनतीवर या मोजक्या लोकांनी पाणी टाकले. यावरून असे दिसते की,अजूनही लोकांना याचे गांभीर्य दिसत नाही. संचारबंदीत शहर कसे दिसते ? हे पहायला काही अति उत्साही लोक बाहेर येताना दिसतात. जर बाहेर फिरणाऱ्या एकाही व्यक्तीला याची बाधा झाली?तर,त्याच्या कुटुंबाला या संक्रमणाची बाधा होण्यास वेळ लागणार नाही आणि त्यानंतर त्या परिसरात याचा फैलाव झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन जाईल. असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.
(वृत्तसंस्था)
