दिनांक २३ मार्च,श्रीगोंदा :
कोरोना विषाणूचा हाहाकार उडाल्यानंतर पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहरातून श्रीगोंदे तालुक्यातील वेगवेगळ्या ११५ गावांमध्ये सुमारे तीन हजार नागरिक आल्याची सर्वत्र चर्चा आहे. या नागरिकांच्या तातडीने नोंदी घेण्याचे आदेश गावचे सरपंच, ग्रामसेवक, कामगार तलाठी आणि सहाय्यक कृषी सहाय्यक
यांना दिले असून, त्यांची तात्काळ माहिती संकलित केली जाणार आहे.अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन ( माळी ) यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अशा नागरिकांची माहिती संकलित झाल्यानंतर, त्यांना नोटीसा देऊन काही सूचना दिल्या जाणार आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरातून हे नागरिक ज्या घरात आलेले आहेत. ते घर त्यांनी १४ दिवस सोडू नये, शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे जावू नये,स्वच्छतेची काळजी घ्यावी, ज्यांना सर्दी-खोक्ल्याचा त्रास असेल, त्यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्याच्या निगराणीखाली श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात तपासण्या करून घ्याव्यात, आजाराची लक्षणे कोणीही लपवू नयेत आणि स्वत: बरोबर इतरांनाही त्रास होणार नाही, याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी.असेही आवाहन श्री. महाजन ( माळी ) यांनी माध्यमांशी बोलतांना केले आहे.
