येवले चहा प्रमाणे,श्रीगोंद्यातील चहाचीही अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी करणे गरजेचे…
दिनांक २५ सप्टेंबर श्रीगोंदा:
पुण्यासह राज्यातील इतर भागांत अल्पावधीत उदयास आलेल्या, येवले चहावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई झाल्याचे समोर आले आहे.कमी वेळेत चहा प्रेमींमध्ये प्रसिद्ध झालेल्या,पुण्यातील ‘येवले अमृततुल्य चहा’विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FDA) कारवाई केली आहे. या चहामध्ये मेलानाईटचा मोठया प्रमाणात वापर होत असल्याच्या माहितीनुसार, पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनीं ही कारवाई केली आहे.
अश्याच प्रमाणे श्रीगोंदा शहरांत शनिचौक परिसरात मोठ्या प्रमाणात चहाची विक्री होत असून,याठिकाणी बनविण्यात येणारा चहा त्यांच्याकडे असलेल्या सील बंद पाकिटातील पावडरच्या माध्यमातून बनविण्यात येत आहे.या पाकिटाच्या आत बारीक बुकटी केलेली पावडर असून,तिचा केमिकल सारखा वास येतांना जाणवतो आहे.शिवाय या पाकिटातील पदार्थांचे विश्लेषण पाकिटावर नमूद करण्यात आलेले नाही. येवले प्रमाणे श्रीगोंदा शहरातही चहाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येते आहे.अनेकांच्या चर्चेतून शहरात शनी चौकातील थोड्याच दिवसांत नावारूपाला आलेला चहा विक्रेता, चहात केमिकल वापरून चहा तयार करीत असल्याचे,बोलले जात आहे.
येथे चहा शौकीनांची रोज मोठी गर्दी होत असून,या विक्रेत्याचे परवाने,येथील कामगारांचे फिटनेस,दुधासह पाण्याची गुणवत्ता,पाकिटांवर लेबल नाही,तर नेमके कोणते पदार्थ पाकिटात वापरण्यात येत आहेत? याचीही FDA (अन्न आणि औषध प्रशासनाने)तपासणी करीत,माहीती घेणे गरजेचे झाले आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ नुसार, देशभरात ५ ऑगस्ट २०११ पासून हा कायदा लागू केला आहे. जनतेला सुरक्षित, सकस आणि निर्भेसळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे असा या कायद्याचा उद्देश आहे.