दिनांक ४ मे, श्रीगोंदा:
कोरोनाने सर्वत्रच हाहाकार माजवला असतांना, कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लॉकडाऊन, कर्फ्यू प्रशासन लावत आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय मात्र, कोरोना प्रादुर्भाव वाढवण्यासाठी निमित्त ठरत असल्याचे समोर आले आहे.
श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी जनता कर्फ्युबाबत काल प्रसिद्धीपत्रक काढत लॉकडावून जाहीर केला आहे. दिनांक ५ मे ते १४ मे पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून, याबाबतचे प्रसिद्धीपत्र काल दिनांक ३ मे रोजी प्रसिद्ध केले आहे. अचानक जाहीर केलेल्या १० दिवसांच्या या लॉकडाऊनमुळे दैनंदिन गरजेच्या मूलभूत वस्तू गोळा करण्यासाठी मोठया प्रमाणात लोक घराच्या बाहेर पडल्याचे दिसून आले. आज दिनांक ४ मे रोजी श्रीगोंदा शहरांमध्ये किराणा, भाजीपाला, दूध, पेट्रोल या जीवनावश्यक वस्तूंच्या संकलनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी बाहेर पडली. या गर्दीला सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी साधी पोलीस यंत्रणा किंवा प्रशासन पदाधिकारी समोर आल्याचे दिसले नाहीत. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांच्या १४४ कलमाला या ठिकाणी सर्व श्रीगोंदा वासीयांनी मूठमाती दिली. त्याचबरोबर श्रीगोंदा शहरात झालेल्या गर्दीमुळे संक्रमणाचा धोकाही आता वाढला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडल्याने ठीक ठिकाणी गर्दी झाली. यामुळे शासकीय नियमांना लोकांनीच धाब्यावर बसवले आणि प्रशासनाने मात्र, बघ्याची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक प्रशासनाने जनता कर्फ्युचा घेतलेला निर्णय जरी, जनहिताचा असला तरी, अशा पद्धतीने गर्दी होणे हे दहा दिवसांच्या जनता कर्फ्यु नामक बंधनावर पाणी फिरवल्यासारखेच आहे. (A fair was held in Shrigonda on the occasion of Janata Curfew.)
स्थानिक प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार तथा पोलीस इन्स्पेक्टर यांनी याबाबत नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, या जनता कर्फ्युबाबत कोणतेही नियोजन न झाल्याने, अचानक झालेली गर्दी श्रीगोंदयात कोरोना प्रादुर्भावाची संख्या वाढण्याची शक्यता बळावत आहे.
स्रोत:(श्रीगोंदा शहरातील आजची परिस्थिती)


