दिनांक ५ मे, श्रीगोंदा
तालुक्यात दिनांक ५ मे ते दिनांक १४ मे २०२१ दरम्यान जनता कर्फ्यू लागू केला असल्याबाबत तहसीलदार प्रदीप पवार यांनी जाहीर केले. या जनता कर्फ्यूमुळे हातावर पोट असणाऱ्या शेतकरी, गरीब, भाजी विक्रेत्यांना मोठा फटका बसणार असून, उपजीविकेसाठी त्यांची अडचण निर्माण होत, उपासमार होणार आहे. असे मत व्यक्त करून, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी या जनता कर्फ्यूचा निषेध करीत विरोध दर्शवला आहे. त्यांनी याबाबत माध्यमांना प्रसिद्धीपत्र देत त्यांची भूमिका कळविली आहे. (Shrigonda.. Protesting against public curfew, BSP protested..)
प्रसिद्धिपत्रात नमूद केले आहे की, माननीय तहसीलदार पवार साहेब तालुका श्रीगोंदा यांनी दिनांक ५ मे २०२१ ते १४ मे २०२१ असा जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे मजूर, शेतकरी, भाजीविक्रेते यांना मोठा फटका बसणार आहे. रोजच्या रोज थोडं – थोडं आणून खाणाऱ्या साधारण माणसाची यात उपासमार होणार आहे. जगण्यासाठी पोटाची भूक भागणे आवश्यक आहे व या जनता कर्फ्युमुळे अशा गरीब व दुर्बल घटकांना जगणे अवघड होणार आहे. यात अगोदरच शनिवार व रविवार निर्बंध लागू आहेत. तसेच, सर्वांकडून लॉकडाऊनच्या या नियमांचे पालन केले जात आहे. जनता विनाकारण फिरतांना दिसत नाही. सर्व दुकानं, भाजी विक्रेते वेळेचे पालन करीत आहेत. असे असतांना जनता कर्फ्यु लावणे अन्यायकारक असून, त्यामुळे शेतकरी वर्गाने पिकवलेला माल जागेवरच सडणार आहे. परिणामी लिंबू व भाजीपाला शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, त्यात कृषी केंद्र व औषधांची दुकाने बंद राहिल्याने शेतीमाल खराब होणार आहे. असे मत व्यक्त करीत सुनील ओहोळ यांनी या जनता कर्फ्यूचा निषेध केला आहे.

प्रशासनाने शेतकरी, कष्टकरी व गरीब जनतेचा विचार करीत, या जनता कर्फ्यूवर फेरविचार करावा. असेही त्यांनी नमूद केले आहे. हा कर्फ्यु सामान्यांना चिड आनणारा व सहनशक्तीच्या पलीकडचा असल्याने, प्रशासनाने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये. असा इशाराही सुनील ओहोळ यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रातून दिला आहे.
स्रोत:(प्रसिध्दीपत्र)
