दिनांक १६ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील बाजार तळावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री अण्णासाहेब सिताराम शेलार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेसाठी प्रचंड गर्दी उसळली. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. सभेला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला असून, उशिरा पोहोचलेल्या आंबेडकरांना पाहण्यासाठी उपस्थित जनसमुदाय ताटकळत थांबला होता.
सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेखा पुणेकर होत्या, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी केशव कातुरे यांनी उत्तमरीत्या पार पाडली. समता सैनिक दलाने व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. प्रमुख मान्यवरांमध्ये गोरख आळेकर, बापू माने, अरुण जाधव, ऋषिकेश शेलार, कांतीलाल कोथंबीरे, दिपक बोराडे, नवनाथ वाघमारे, ओंकार शिंदे, संतोष जौंजाळ, राम भाऊ चितळकर, ज्ञानदेव गवते, नवनाथ वाघमारे, तय्यब जाफर, संजय डाके, कांतीलाल कोकाटे तसेच मुस्लिम, ओबीसी, धनगर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऋषिकेश शेलार यांनी कारखानदारांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत विकासाचे मुद्दे मांडले. “संत शेख महंमद महाराजांची पांढरी, येथे अन्याय चालणार नाही,” असे सांगून त्यांनी मतदारांना जागृत होण्याचे आवाहन केले.
श्रीगोंदा मतदारसंघातील घोड धरण, कुकडी विसापूर, एमआयडीसीसारख्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी प्रस्थापितांवर जोरदार टीका केली. “तरुणांच्या हातात काम नाही, तर शेतकऱ्यांची टिंगल केली जाते,” असे स्पष्ट करत, ते निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवणार असल्याचे सांगितले.”आम्ही संपूर्ण कुटुंबीय सर्वस्व पणाला लावले आहे,” असे म्हणत त्यांनी सामान्य जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अरुण जाधव यांनी प्रस्थापितांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेवर जोरदार टीका करत, वंचितांचा स्वाभिमान खरेदी करता येणार नाही, असे ठामपणे सांगितले. “हा गुलाल हुकला तर पुन्हा वेळ मिळणार नाही,” असे स्पष्ट करत, गरीबांच्या छपरावर गुलाल पडावा, हीच अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी प्रस्थापित उमेदवारांच्या नीतिमत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अण्णासाहेब शेलार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. “निवडणूक लढणार नाही, अशी शंका व्यक्त होत होती, पण मी तीन साखर सम्राटांच्या विरोधात उभा आहे,” असे त्यांनी सांगितले.
“तुम्ही सामान्यांचे प्रश्न चोरलेत,” असे प्रस्थापितांवर टीका करत, २० तारखेला जनतेच्या मताने तीन दिग्गज नेत्यांना पराभूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.
शेलार यांनी पाच खोक्यांचा सौदा नाकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाकडून मिळालेला एबी फॉर्म स्वीकारल्याचा अभिमान व्यक्त केला. “शरीराने तिकडे असलेले अनेक जण मनाने आमच्यासोबत आहेत,” असे सांगत त्यांनी सामान्य जनतेसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांवर टीका करत, “साडेचारशे कोटींची संपत्ती असलेल्या नेत्यांच्या विरोधात सामान्य शेतकरी उभा आहे,” असे नमूद केले. त्यांनी मतदारांना अण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
आंबेडकर यांनी सांगितले की, “जागीरदार आणि इनामदारांनी महाराष्ट्र बिघडवला,” तर प्रस्थापित नेत्यांवर विचारभेसळ केल्याचा आरोप केला. विक्रम पाचपुते यांच्यावर टीका करत, “जो उमेदवार आईचा नाही, तो जनतेचा कसा होईल?” असे त्यांनी विचारले.
मुस्लिम बांधवांना आवाहन करत, “महंमद पैगंबर साहेबांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर आम्ही सत्तेत आल्यास कठोर कारवाई करू,” असे आश्वासन दिले आणि शेलार यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. मुस्लिम, ओबीसी, धनगर व इतर समाजघटकांनी एकत्र येत शेलार यांना साथ देण्याची तयारी दाखवली.
स्रोत:(जाहीर सभा)




जाहिरात..
