एक नातं.. एक साथ.. एक आठवणं.. सुभाष ससाने (तात्या) भावपूर्ण आदरांजली..

भावपूर्ण श्रद्धांजली : सुभाष ससाने उर्फ सुभाष तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ..
लेखक : चंदन दीपक घोडके
दिनांक : १७ जून २०२५, श्रीगोंदा

आजचा दिवस वैयक्तिक पातळीवर मन सुन्न करणारा ठरला. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज सुरू असताना, संध्याकाळी एका हॉटेलमध्ये मित्राकडून एक अत्यंत दुःखद बातमी मिळाली — सुभाष ससाने तात्यांचे निधन झाले. क्षणभर काहीच सुचले नाही. मन सुन्न झाले. हृदयात एक वेदनेची लाट उठली. कारण सुभाष ससाने म्हणजे फक्त एक नातलग किंवा ओळखीचे व्यक्तिमत्व नव्हते, ते आमच्या कुटुंबासाठी आधार होते.

सुभाष ससाने हे माझ्या वडिलांचे, दीपक घोडके यांचे अत्यंत निकटचे मित्र आणि विश्वासू सहकारी होते. १९८० ते १९९९ या कालखंडात त्यांनी आमच्या कुटुंबाच्या उद्योगात खांद्याला खांदा लावून साथ दिली. आमच्या लहानपणाच्या त्या सुंदर आठवणींमध्ये सुभाष तात्यांचे स्थान कायम अग्रस्थानी राहिले आहे. ते आमच्या वडिलांचे केवळ व्यावसायिक सहकारी नव्हते, तर कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होते.

कराड येथे पत्नी व मुलांसोबत राहणारे सुभाष तात्या यांना गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यांचा दशक्रिया विधी श्रीगोंदा येथे होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुभाष तात्यांची आठवण आली की, एक चित्रपटासारखा काळ डोळ्यासमोर तरळतो. वडिलांचा होलसेल स्क्रॅप व्यवसाय असो, की त्या काळात घरी कलर टीव्ही, मर्फीचा टेप रेकॉर्डर थ्री-इन-वन किंवा साउंड सिस्टम घेऊन जाण्याचा प्रसंग — प्रत्येकवेळी सुभाष तात्या वडिलांसोबत होते. वडिलांच्या मागे त्यांच्या एझडी, राजदूत किंवा बुलेटवर बसलेले, बाजारात साहित्य खरेदी करताना मदतीस तत्पर, एखाद्या वेळेस कौटुंबिक वादात समेट करणारे, तसेच दिवाळी सारख्या आनंद उत्सवात आमच्या सोबत असणाऱ्या तात्याचे अनेक प्रसंग आठवतात.

ते व्यवसायात जेवढे निष्ठावान होते, तेवढेच ते माणुसकीच्या नात्यांमध्येही खोलवर रुजलेले होते. घरातलं कोणतंही छोटं-मोठं काम असो, सुभाष तात्यांनी त्याकडे आपल्या घरासारखेच लक्ष दिले. आमच्या वडिलांचे ते केवळ मित्र नव्हते, तर भावासारखे होते. त्यांच्या आणि आमच्या कुटुंबाच्या नात्यांमध्ये जी जवळीक होती, ती आजच्या काळात दुर्मिळ वाटावी अशीच होती.

सुभाष तात्यांच्या जाण्याने एक असा ऋणानुबंध संपुष्टात आला आहे, जो शब्दांत व्यक्त करता येणारा नाही. परिस्थिती, प्रसंग आणि वाटेत भेटणारी माणसं आयुष्य घडवतात, हे त्यांचं आयुष्य पाहिलं की सहज लक्षात येतं. त्यांनी केलेला संघर्ष, मैत्रीच्या नात्यांमध्ये दाखवलेली समजूत, आणि दिलेले योगदान — हे सारे आज आठवताना डोळ्यांत अश्रू येतात.

आज त्यांच्या जाण्याने आमचं कुटुंब जणू एका आधारहीन झाल्यासारखं वाटतं आहे. आम्हा सर्वांच्या मनात सुभाष तात्यांच्या आठवणी जिवंत राहतील. त्यांनी दिलेल्या मोलाच्या साथीसाठी आणि प्रेमासाठी आम्ही कायम त्यांचे ऋणी आहोत.

सुरेश भट हे महाराष्ट्राच्या साहित्यविश्वातील एक अत्यंत संवेदनशील, आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व. त्यांनी प्रेम, बंडखोरी, सामाजिक व्यथा, आणि मृत्यू यांसारख्या अनेक विषयांवर ज्वलंत आणि प्रभावी कविता लिहिल्या आहेत. “मृत्यू” या संकल्पनेवर त्यांनी लिहिलेली एक उल्लेखनीय कविता म्हणजे:

मृत्यू येईल गाण्यासाठी
सूर उमटतील शेवटचे!
तू विझू नकोस, मिणमिणत्या
समईसारखा जीवनाचे…

त्या अखेरच्या सुरांत माझे
गीत विरघळले असेल…
मृत्यू येईल गाण्यासाठी —
म्हणून आज चालतो शांततेत…

सुभाष शंकर ससाने उर्फ सुभाष तात्या — या महान व्यक्तिमत्त्वाला आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

तुमची आठवण आणि तुमचे मोलाचे योगदान आम्ही कधीही विसरणार नाही.

स्रोत:(निवडक आठवणी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading