दिनांक २९ मार्च २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कावेरी मोहन शिंदे व मनिषा मोहन शिंदे या मुकबधीर बहीणींना सहा किमीची पायपीट करत रोज शाळेत जावे लागत होते. मात्र, त्यांच्या या कष्टदायक प्रवासाला पूर्णविराम मिळाला आहे. अग्नीपंख फौंडेशनने त्यांना सायकली भेट दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे.

ही सायकल भेट श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर व गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी सांगितले की, “अग्नीपंख फौंडेशन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सतत कार्यरत आहे. शिंदे बहीणींना या सायकलींची अत्यंत गरज होती आणि ती पूर्ण झाल्याने त्या निश्चितच आपले ध्येय गाठतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका नीलिमा कातोरे, पर्यवेक्षक बी. आर. शिंदे, महादेव घोडके, अमोल गव्हाणे, संजय राऊत आदी उपस्थित होते. गुरुकुल विभागाचे प्रमुख किरण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

शिंदे बहीणी या भटक्या विमुक्त समाजातून असून त्यांच्या आई-वडिलांचे मुख्य उत्पन्न मोलमजुरीवर अवलंबून आहे. दिव्यांग विशेष शिक्षक रोशन घोडके व सोनाली अकोलकर यांनी त्यांच्या परिस्थितीची दखल घेत त्यांना सायकली देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर अग्नीपंख फौंडेशनने तात्काळ सायकलीची व्यवस्था केली. या मदतीमुळे दोघींना शिक्षणासाठी अधिक संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या भविष्याला नवे पंख मिळाले आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


Advertise…
