दिनांक २ सप्टेंबर २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरात मागील आठ दिवसांपासून दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईची चर्चा जोरदार सुरू आहे. या कारवाईमागील कारण जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील काही व्यक्तींनी ऑनलाईन जुगार खेळात लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऑनलाइन जुगार खेळवणाऱ्या काही कंपन्यांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी काही व्यक्तींकडून त्यांची बँक खाती आणि त्या खात्याशी संबंधित सर्व माहिती ताब्यात घेतली होती. या माध्यमातून खेळात हार-जीत होणाऱ्या ग्राहकांच्या व्यवहारातून नफा कमावण्यासाठी ही माहिती वापरली जात होती. याबदल्यात, त्या व्यक्तींना या व्यवहारांमध्ये मिळणाऱ्या रकमेच्या १० टक्के कमिशन दिले जात होते.
मात्र, या प्रक्रियेत काही लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात थेट श्रीगोंद्यात येऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. परंतु, ही कारवाई तडजोडीद्वारे संपवण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी सुमारे अडीच लाख रुपयांची तडजोड झाल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तसेच, श्रीगोंदा शहरातील दोन व्यक्तींना पुण्यातील चौकशीसाठी नेण्यात आल्याचेही समजते.
या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही, मात्र श्रीगोंदा तालुक्यात या प्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरू आहे. नेमके काय झाले..? दिल्ली पोलीस श्रीगोंद्यात कसे आले..? आणि ही फसवणूक कशी घडली.? याबाबत अद्याप माहिती अस्पष्ट आहे. परंतु, या घटनेची चर्चा मात्र शहरात चांगलीच रंगली आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)






