बनगरवाडी…
टाकून गेला. “कुरबूर होईल न्हाई तर काय ? लगीन करायचं म्हनत्यात दुसरं ! “मी खोटेच आश्चर्य दाखवीत म्हणालो,” कोण, शेकू ? हे काय सुचलं एकदम त्याला ? ” एकदम कसं ? कारभारी मेला. चांगला हुता बिचारा. पर मरता मरता माज्या संसारात इस्तू शेकूच्या बायकोचा गळा दाटून आला. डोळे पाण्याने भरले. ते पदराने पुसून तिने आवंढा गिळला आणि मग खाजगी आवाज काढून ती बोलू लागली, “ सारकं त्या पोरीच्या मागं असत्यात. तीबी तरन्या पोराला दाखवाव्यात तशा हुलकावण्या देतीय. मी कसं हे बघून गप्प बशीन ? तिला एक अक्कल न्हाई ! नसायला काय झालं ? न्हातीधुती हाय आता ! पर अब्रू न्हाई म्हना. पर ह्येनी का तिच्या नादी लागावं? जनाची न्हाई, मनाची तरी लाज पायजे. तुमासारखी काय म्हनतील ? पोरगी त्या म्हाताऱ्यानं संबाळायला दिली. चांगला पोरगा बघून तिचं लगीन करायचं, भलेपणा घ्याचा. ते सोडलं आन् चांगलं नादावून बसल्यात तिला. कामधाम काय न्हाई. लुगडी आना, चोळी आना. तुमीच सांगा, आता हे बरं का? ” मग मी खोटेच आश्चर्य दाखवले. लटका राग आणला. “हे तुम्हीच सांगताय म्हणून खरं म्हणायचं.

एरवी शेकू हा माणूस वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारा. त्याच्या हातून अशी गोष्ट होणार नाही. पण आता तुम्हीच म्हणताय तेव्हा ते खरं असलं पाहिजे! “खोटं कशाला वं सांगीन मी. ह्यात अब्रू एकली त्येचीच जातीय का ? माजी न्हाई का जात ! गळ्यापतूर येस्तोवर अशी गोष्ट कुनी कुनापाशी बोलंल का? “छे, हा गाढवपणा झाला शेकूचा. इतके दिवस मिळवलेला चांगुलपणा घालवायचा आणला त्यानं ! “माझ्या या बोलण्याने शेकूची बदनामी होत आहे असे वाटून त्या बाईने घाईने खुलासा केला,”
“तसं काय त्या पोरीचं वाटुळं करायचं न्हाई त्येना. लगीन करायचं म्हनत्यात. “पण ही काय रीत झाली का लग्न करायची? आणि आजच लग्नाची गरज का लागली? “पोर न्हाई माज्या पोटाला. पोरासाटनं करत्यात ! “यावर मी निरुत्तर झालो. ते माझ्या चेहऱ्यावर दिसले आणि मी बोलावे ते शेकूची ती शहाणी बायकोच बोलली , “पोर न्हाई ते खरं हाय . पर कुटं आता इस्टेट वाया चाललीय ? आन् आपली पुण्याई असली तर देव दील की . का वं ? ” मी म्हणालो, “पण मग एखादी मुलगी बघून नीट लग्न करावं” कशाला ? दोघांची पोट भरायची मारामार ! बघताय नव्हं तुमी कसं चाललंय ते ? आन् ती कोन ईल तिची तरी कूस पिकंल कशावरनं वं ? देवाच्या मनातच असलं तर वठक्या झाडाला सुदीक फळ धरल ! “मी आपला ऐकत होतो. मधूनमधून बोलत होतो. कपाळावर मोठे ठळक कुंकू लावलेली, राठ अशी बाई बोलत होती. नवऱ्याच्या बरोबरीने शेतकाम करणारी, ढोराबरोबर औत ओढणारी ही बाई नवऱ्याच्या या वागणुकीने किती पेचात पडली होती.
त्या अंजीला झिंज्या धरून बाहेर काढणे हिला अशक्य होते का ? पण हे काहीही न करता ही बाई एका मास्तरापुढे बसून दीनवाणे बोलत होती. तिचे डोळे पाण्याने भरत होते. नाकपुड्या थरथरत होत्या. ओठ थरथरत होते. माझ्या मनात जे आले ते तिच्याही आले असणे अगदी शक्य होते. अंजीचा दोष नाही, ती वयात आली आहे. सारासार विचार तिच्यापाशी असणार नाही. नाही म्हटले तरी शेकू तिच्याकडे ओढला जाणे स्वाभाविक होते. हे सगळेच इतके नाजूक होते की , मनगटाचा जोर इथे फुका होता. आणि हे या बाईने ओळखले असले पाहिजे. त्याशिवाय ती अशी तिर्हाईताइतापुढे येऊन बोलत बसली नसती. मी पुन्हापुन्हा म्हणत होतो, “शेकूचं हे वागणं खरं नाही. त्याला कळलं पाहिजे.

‘शेवटी शेकूची बायको म्हणाली, ” मास्तर, तुमाकडं आले ते तुमी गावचं जानतं मानूस म्हणून. पंतसरकारापतूर तुमचा मान हाय. तुमी मालकांस्नी जरा दटावा. पडला तर तुमच्याच सांगण्याचा मान पडल !” पण बाई, ही खाजगी बाब. मी बोललो आणि ‘तू रे कोण मला पुसणारा ? ‘असं त्यानं विचारलं, तर माझं काय राहील?” यावर हातवारे करून शेकूची बायको म्हणाली, ” ऊं. ते काय इचारत्यात तसं ? हातात बेड्या पडतील की फशिरी. तेवढं कळतंय बरं का नीट असे बोलणे चालले आहे तोच शाळेची घंटा खणाणली. आयबू , सता ही पोरे आली आणि शेकूची बायको उठली. म्हणाली, ‘ बराय, जाते. “आणि निघून गेली . शेंगांचा ढीग अद्याप तसाच होता. त्याकडे बघून आयबूने विचारले, “ नानीनं आणल्या काय शेंगा, मास्तर ? “
क्रमशः
स्त्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
