दिनांक १५ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील अतिक्रमण नियमांकुल करणेबाबत ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी दुजाभाव करु नये. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा “नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस” च्या कार्यकर्त्या तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्या श्रीमती मीराताई शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रातून दिला आहे.

अतिक्रमण नियमांकुल करणेबाबतचे परिपत्रक आल्यानंतर ग्रामसभेत याची माहिती देणे, निवासी हेतूने अतिक्रमण केलेल्या भागात जाऊन त्यांचा पंचनामा करून संपूर्ण अहवाल व अतिक्रमण केलेल्या लोकांची यादी १५ मार्च २०२१ पर्यत देने आवश्यक असतांना, आत्तापर्यंत प्रत्यक्ष जागेवर न जाता, ऑफिसमध्ये बसून किंवा राजकीय लोकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याने, खरे लाभार्थी वंचीत राहून ग्रामपंचायत मधील पुढाऱ्यांच्याच जवळच्या लोकांचे अतिक्रमण नियमांकुल होतील.
“नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस” (NDNJ) ने शासन परिपत्रक निघाल्यापासून पाठपुरावा करत आहे. परंतु, मागील १५-२० वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरीब, भूमिहीन, दलित, भटके, आदिवासी हे शासकीय जमिनीवर निवासी हेतूने घरे बांधून राहत आहेत. यांचेकडे स्वतः चे राहते घर येवढाच पुरावा असल्याने, त्या भागात जाऊन पंचनामे होणे गरजेचे होते. पण, गटविकास अधिकारी प्रशासन याबाबत उदासीन असल्याने, मुदत संपल्यावर जागे झालेले दिसतायेत.
अतिक्रमण नियमांकुल समिती अध्यक्ष उपविभागीय अधिकारी यांनी या मध्ये लक्ष घालावे व पंचनामा करून, अतिक्रमण धारकांची यादी घ्यावी, कारण २०११ पूर्वीचे अतिक्रमण अधिकृत करण्यासाठी अतिक्रमण धारकाकडे बांधलेले घर हा एकच पुरावा आहे. मुळात शासकिय जमिनी वरील अतिक्रमण धारकांपैकी काहींना ग्रामपंचायतने कर पावत्या दिलेल्या आहेत. तर, बहुतांशी लोकांना पावत्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना पुरावे मागून वेठीस न धरता जागेवर जाऊन पंचनामा करावा.

अन्यथा “नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस” (NDMJ) मोठ्या स्वरूपात आंदोलन करील. असा इशारा मीराताई शिंदे यांनी दिला आहे.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
