दिनांक २३ जुलै २०२४, श्रीगोंदा:
दादासाहेब रूपवते यांचे कार्य बहुजन चळवळीत दीपस्तंभ सारखे आहे. असे प्रतिपादन प्राध्यापक अनिल ढवळे यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वस्तीगृह श्रीगोंदा येथे दादासाहेब रूपवते स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश चव्हाण होते.
ते पुढे म्हणाले सामान्य माणूस म्हणून दादासाहेब रुपवते ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्राचे संपादक होते. सुरुवातीला ते शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते.
बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी होते. ते साप्ताहिक “प्रबुद्ध भारत” चे संपादक होते. आंबेडकरांच्या दलित बौद्ध चळवळीपासून प्रेरित होऊन, त्यांनी १९६२ साली बहुजन शिक्षण संघाची निर्मिती केली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांची मुले शिक्षण घेऊन मोठी झाली. याचे सर्व श्रेय दादासाहेब रूपवते यांना जाते.
यावेळी समीरजी बोरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा जीवनात येणाऱ्या अनंत अडचणीवर मात करुन आपली जीवन यशस्वी करावे. वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी समाजाचे व देशाचे नाव उज्वल करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसुडे, प्रा.सिद्धार्थ बर्वे, प्रा.मिलिंद बेडसे, सामाजिक कार्यकर्ते विलास घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सतीश ओहोळ यांनी केले. तर, आभार अँड प्रितेश काळेवाघ यांनी मानले.
स्रोत:(सतीश ओहोळ सर)






