दिनांक ११ जानेवारी, अहमदनगर:
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे, क्रांतिकारी फकीरा राणुजी साठे व मुक्ता साळवे यांची नावे महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जिल्हा संपर्कप्रमुख कडूबाबा लोंढे, श्रीगोंदा अध्यक्ष चंद्रकांत सकट, उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे, भिंगार शहर अध्यक्ष वरूण वाघमारे, बन्सीभाऊ वाघमारे, विशाल भालेराव, विठ्ठल पाटोळे, बंडू पाडळे, विराज साळवे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातंग समाजाचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान शूर वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव महाराष्ट्राच्या महापुरुषाच्या यादीत नाही. लहुजी वस्ताद हे एक क्रांतिकारक होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत होते. लहुजींचे घराणे शस्त्रविधे मध्ये निपून व तरबेज होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या आजोबांना पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती.

लहुजी वस्ताद यांनी पुणे येथे १८२२ साली देशातील पहिली तालीम सुरू केली होती. या तालमीत प्रशिक्षण घेण्यासाठी बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू यांच्यासह अनेक क्रांतिकारी लहुजी च्या तालमीत घडले. १८४८ साली लहुजीच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलीची शाळा सुरू केली. या शाळेत प्रशिक्षण घेणारी पहिली विद्यार्थिनी होती लहुजी वस्ताद यांची पुतणी मुक्ता साळवे यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे.
तसेच, फकिरा राणूजी साठे म्हणजे वीर योद्धा फकीरा मांग यांनी देखील इंग्रज राजवटीत गोरगरिबांच्या छळाच्या विरोधात मोठा लढा उभारला. फकिरा साठे यांच्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार दिली होती. ही तलवार घेऊन फकिरा साठे हे इंग्रजांशी लढले, अशा अनेक मातंग समाजातील महापुरुषांना हे सरकार जाणीवपूर्वक डावलण्याचे काम करत आहे.
तसेच, मातंग समाजातील महापुरुषांचा अवमान करत आहे. याबाबत मातंग समाज गप्प बसणार नाही. आपल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना मातंग समाजातील या महापुरुषांचा इतिहास माहित आहे. तरीदेखील हे सर्व गप्प आहेत. यापुढे प्रशासनाने लवकरात लवकर मातंग समाजातील महापुरुषांची नावे महाराष्ट्र शासनाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी. अन्यथा, दलित महासंघाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
स्रोत:(चंद्रकांत सकट, दलित महासंघ)
