दिनांक ८ जून,श्रीगोंदा:
श्रीगोंदा, कर्जत, आष्टी तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या निमगाव गांगर्डा येथील सीना मध्यम प्रकल्पात सध्या पाण्याचा फक्त मृत साठा शिल्लक आहे.२४०० दशलक्ष घनफूट धरणाची क्षमता आहे. आज पाणी पातळी ५७० दशलक्ष घनफूट एवढी आहे व धरणात आज अखेर १२० दक्षलक्ष घनफूट एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील घोगरगाव, थिटेसांगवी, चवरसांगवी, बनपिंप्री, तरडगव्हाण, रुईखेल, व इतर धरणग्रस्त गावे सीना-कुकडी लाभक्षेत्रात येतात. तर, कर्जत तालुक्यातील अनेक गावे सीना धरणातील पाण्यामुळे ओलिताखाली येतात. धरणात असलेल्या सध्याच्या ३०% पाणी साठ्यातुन मिरजगाव पाणी योजना कार्यान्वित आहे व शेजारील आष्टी तालुक्यातील पिण्याचे पाण्याचे टँकर देखील चालु आहेत.हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस येणार्या पंधरवाड्यात लांबणार आहे. त्यामुळे शेतीमधील उभी पिके टिकली पाहीजेत. शेती पिकली तरच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आपले शैक्षणिक शुल्क भरु शकतील.त्यामुळे चालु कुकडीच्या आवर्तनातुन भोसे खिंडी द्वारे सीना मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्यात यावे.अश्या मागणीचे निवेदन सीना धरण परीसरातील शेतकरी पुत्रांनी तहसिलदार महेंद्र माळी यांना दिले आहे.
विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष आदिल शेख, शुभम वाघ, ऋषिकेश ननवरे, धिरज खेतमाळीस, ऋषिकेश पवार, वसिम जमादार, सौरभ वाळके, संकेत जंजीरे, शुभम शिंदे, प्रशांत भोस, प्रदिप वाल्हेकर, यांच्या निवेदनावर सह्या आहेत. यावेळी प्रा.कानिफनाथ उगले यांनी शेतकर्यांची व्यथा प्रशासनासमोर मांडली आहे.
