दि. ६ जून (जोशीवस्ती, श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील जोशीवस्ती, लिंपणगाव येथे वास्तव्य करून असलेल्या ३०० भटक्या – विमुक्त समाजातील कुटुंबाना ‘मानव विकास संशोधन केंद्र‘ भोसरी, पुणे यांच्या पुढाकाराने किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. वैदू, जोशी, डवरी गोसावी, तिलमारी, नंदीवाले, बहुरूपी, वडार, पारधी अशी भटक्या – विमुक्त, आदिवासी समाजातील ३०० कुटुंबे येथे वास्तव्याला असून, मुळात मूलभूत सुविधांचा अभाव असणाऱ्या या वंचित आणि विस्थापित समाज घटकांवर कोरोना संक्रमण काळात उपासमारीची वेळ येऊन ठेपली असतांना “मानव विकास संशोधन केंद्रा”चे अध्यक्ष भालचंद्र सावंत यांच्या पुढाकाराने या समाज बांधवांना अन्न, धान्य किट वितरीत करून मदतीचा हात देण्यात आला आहे.

काल दिनांक ५ जून रोजी पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे किट वाटप करण्यात आले. जोशी वस्ती हे भटक्या-विमुक्तांसाठीचे महाराष्ट्रातील पहिले महसुली गाव म्हणून, ओळखले जाते. या कसब्याचे महसूल गावात रूपांतर करण्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भालचंद्र (आण्णा) सावंत यांनी अनेक संकटानां तोंड देत, ही प्रशासकीय प्रक्रिया ग्राम विकासासाठी पूर्णत्वास नेली आहे.
कालच्या सामाजिक उपक्रमांत पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते असीम तांबोळी, जान्हवी खांडेकर, अस्मा तांबोळी यांनी उपलब्ध करून दिलेल्या अर्थसहाय्यातून व प्रा. विनायक लष्कर, दयानंद कनकदंडे, (पत्रकार) मेहबूब शेख यांच्या सहकार्यातून या मदतीचे वाटप करण्यात आले. जोशी वस्ती येथील ग्रामपंचायत सदस्या सौ.उषा फुलचंद सावंत यांनी मदतीच्या वाटपाचे नियोजन केले. याकामी त्यांना आशा सेविका भामा फुलमाळी यांनी सहकार्य केले. अन्नधान्य किट सोबत गावातील महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटपही करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर, डॉ.राजेश पाखरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारी, प्रदीप कोकाटे, फुलचंद सावंत, सागर शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.distribution- of- ration- kits- by- manav-vikas-sanshodhan-kendra-to-the-families-of-joshi-wandering-for-livelihood
भविष्यात जोशी वस्ती व आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
