दिनांक ७ एप्रिल २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:
भापकरवाडी, (कोळगाव ) श्रीगोंदा येथील सौ. डॉ. बदाम नामदेव थोरात उर्फ अंजली भाऊसाहेब भापकर, M.sc.(Agri.)Ph.D (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग) यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय कृषिभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
कृषिभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्ट-अप फेडरेशन (महाराष्ट्र राज्य) तर्फे ५ व्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षाचे कृषिभूषण एक्सलन्स पुरस्कार २०२४ वितरण सोहळा रविवारी (दि. ३१ मार्च) रोजी नाशिक येथे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केबीटी इंजिनीअरींग कॉलेज मध्ये पार पडला.
या सोहळ्यासाठी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील पवार (माजी पणन संचालक), श्री. मोहन वाघ (विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक), प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते श्री. प्रशान्त महाजन, कृषी उद्योजग श्री. शिवाजी डोळे, सौ. वैशाली वाघ, सौ. ज्योती सुरसे (भारतीय कृषक समाज) न्यू दिल्ली, कृषिभूषण कंपनीचे चेअरमन श्री. भूषण निकम, संचालिका सौ. रोहिणी पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील कृषी व्यावसायिक, कृषी विस्तारक, प्रगतशील शेतकरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सौ. डॉ. बदाम नामदेव थोरात, M.sc.(Agri.)Ph.D (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग) मु./पो. सावरगाव, तालुका- जामखेड, जिल्हा – अहमदनगर या एमजीएम नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय गांधेली छत्रपती संभाजीनगर येथे विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग येथे कार्यरत आहेत. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्तितीत शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन, या आपल्या शैक्षणिक व नोकरी क्षेत्रात आपल्या दोन्ही कुटुंबाचे व गावांचे नाव प्रचलित केले आहे. त्यांच्या या कार्यात त्यांना आई – वडील, पती आणि २ मुली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉक्टर बदाम थोरात या कृषी शिक्षण व विस्तार या क्षेत्रात गेली ८ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक काळात ही त्यांना कृषी तसेच खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल कृषी विद्यापीठामार्फत विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर वेगवेगळ्या परिषदे मध्ये त्यांनी आयोजक आणि सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना १२ विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यात अजून एक कृषिभुषण एक्सलन्स पुरस्कार या सर्वोत्कृष्ट पुरस्काराची भर पडली आहे.
यासाठी त्यांनी आकाशवाणी केंद्रावर प्रसारित कार्यक्रम “शेतशिवार, कृषिवाणी व एमजीएम रेडिओ रानवारा” या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन शेतकरी व पशूपालकाना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमधे २२ गोषवारा, १८ शोधनिबंध, ३५ मराठी व इंग्रजी भाषेतील लेख, १ पुस्तक व २ पुस्तक प्रकरण प्रकाशित केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे पती सध्या भारतीय लष्करात रांची तेथे असलेले मेजर भाऊसाहेब संजय भापकर, कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन डुबल, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)
