दिनांक २४ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने विजयासाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वात सौ. अनुराधा नागवडे या श्रीगोंदा मतदारसंघातील निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सौ. अनुराधा नागवडे या नागवडे परिवाराच्या सूनबाई म्हणून श्रीगोंदा तालुक्यात ओळखल्या जातात. सहकार महर्षी कै. शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापू) यांनी या तालुक्यातील जनतेच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला होता. त्यांच्यानंतर श्री राजेंद्र दादा नागवडे आणि श्री दीपक शेठ नागवडे यांनी नागवडे सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे.
नागवडे परिवाराने केवळ सहकारी चळवळच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ज्ञानदीप शिक्षण संस्था, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, न्यू लॉ कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेजची स्थापना केली आहे. या शैक्षणिक संस्थांतून आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत.
सौ. अनुराधा नागवडे यांनी शिवसेनेत प्रवेश करताना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. या प्रसंगी शिवसेना उपनेते श्री साजन भैय्या पाचपुते, लोकप्रिय खासदार श्री संजय राऊत आणि नागवडे परिवाराशी नातं असलेली तालुक्यातील जनता उपस्थित होती. शिवसेनेत सामील होताना त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांकडून प्रोत्साहन आणि आशिर्वाद घेतले आहेत.
सौ. अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंदा मतदारसंघातील सर्व वर्गातील जनतेला एकत्र करून शिवसेनेला पुन्हा एकदा विजयी करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत “उतणार नाही मातणार नाही! घेतला वसा टाकणार नाही!” असा दृढ विश्वास आहे.
त्यांच्या शब्दांत, “मी तुमची बहीण, लेक म्हणून सातत्याने तुमच्यासोबत असेन!” अशा भावनिक आणि जोशपूर्ण घोषणा देत त्यांनी जनतेला विजयासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीचे “लढेंगे और जितेंगे” हे घोषवाक्य घेऊन श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत शिवसेना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. नागवडे परिवाराच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानामुळे या निवडणुकीत त्यांची महत्त्वपूर्ण छाप दिसून येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्त्रोत:(अधीकृत माहिती)





