दिनांक २७ मे, श्रीगोंदा :
घन:शाम (आण्णा) शेलार यांचे तालुक्यातील सामाजिक प्रश्नात योगदान काय ? हे विचारणे म्हणजे, कंदील घेवून सुर्याला शोधण्याचा बालीशपणा आहे. असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (तालुकाध्यक्ष) हरीदास शिर्के (आबा) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केलेले आहे.
घन:शाम (आण्णा) शेलार यांचे तालुक्याच्या प्रश्नात सामाजिक योगदान काय ? हे विचारणे म्हणजे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ९९ हजार मतदारांनी आण्णांना मतदान केले. त्यांना वेड्यात काढण्याचा हा संदीप नागवडे यांचा मोठा बालीशपणा आहे. विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला. तर, तुमच्या नेत्याच्या जीवावर बेतलेले बोटावर निभावले. हे आपण विसरला आहात काय? अन्यथा अशाप्रकारे पोरकटपणाचे विधान करण्याचे तुम्ही धाडस केले नसते. शेलारांवर आरोप करण्यापूर्वी देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या कृपाशिर्वादाने गृहमंत्री (राज्य), वनमंत्री, आदिवासी विकास मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अशी मंत्रीपदे मिळाले असतांना, तुमच्या बोलवत्या धन्याने तालुक्यासाठी कुठले ठोस विकासाचे काम केले? याचा हिशोब जर नागवडे सरांनी पाहिला असता. तर, ते सुद्धा दिगंमुढ झाल्याशिवाय राहणार नाहीत. असाही शिर्के यांनी खोचक टोला नागवडे यांना दिला आहे.
मी खुप गरीब आहे. जिल्ह्यातील प्रस्थापीत नेते मंडळी मला खुप त्रास देतात, असा कांगावा करणाऱ्या पाचपूतेंनी चारशे कोटीचा खाजगी कारखाना, पन्नास कोटीची हवेली, दिडशे कोटीचे शैक्षणिक संकुल, घरातील प्रत्येक सदस्याला आलिशान गाड्या ही संपत्ती कशी उभी केली ? याचा सुद्धा हिशोब नागवडेंनी तालुक्याच्या जनतेला द्यावा, तालुक्याच्या विकासापेक्षा स्वत:च्या राजकीय स्वार्थास प्राधान्य देणाऱ्या पाचपूते यांच्या नाकाखालून कृषी महाविद्यालय श्रीगोंद्यातून हळगांव, ता. कर्जत येथे प्रा. राम शिंदे यांनी नेले. त्यावेळेस हे गप्प का बसले? याचा सुद्धा खुलासा शिक्षण क्षेत्रातील जाणकार म्हणून नागवडे सरांनी करावा.
कोविड -१९ सारख्या जागतीक आपत्तीवर कुणीही राजकारण करु नये. अशी भूमिका मांडणाऱ्या घन:शाम (आण्णा) शेलार यांनी स्वत:च्या वाढदिवसाच्या अनुषंगाने कोवीडी – १९ च्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रु. १,०२,०००/- स्वत:चा निधी दिला. हे पण ध्यानात घ्यावयास पाहिजे होते.
त्यामुळे त्यांचेवर टिका करण्यापूर्वी नागवडे सरांनी आपली सामाजिक, राजकीय उंची मोजली असती. तर, अशा प्रकारचे शेलारांवर टिका करण्याचे धाडस झाले नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदाच आमदार झालेले आ. रोहितदादा पवार व आमदार आशुतोष काळे या तरुण आमदारांनी त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या साखर कारखान्यातील स्पिरीटचा वापर करुन कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी ‘सॅनेटायझर’ तयार करुन, जनतेला मोफत उपलब्ध करुन दिले. परंतू, विधानसभेतील या ज्येष्ठ नेत्याच्या अधिपत्याखालील खाजगी कारखान्यातील ‘स्पिरीट’ कुठे आणि कशासाठी वापरले गेले ? याचाही नागवडे सरांनी खुलासा केला. तर, तालुक्यातील जनता नक्कीच त्यांचे आभारी राहील. खरं तर, नागवडे यांचे वया इतके वर्षे शेलार यांनी सामाजिक प्रश्न सोडविताना प्रसंगी टोकाचा संघर्ष केला आहे. असेही शिर्के म्हणाले व भविष्यात अशा प्रकारची टिका आमच्या नेत्यावर केली. तर, ती सहन केली जाणार नाही. त्याला जशास तसेच उत्तर दिले जाईल. असाही इशारा शिर्के यांनी आपल्या पत्रकात दिला आहे.
