दिनांक ११ जुलै २०२४,मुंबई:
राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या कुकडी प्रकल्पातील पाणी आंबेगाव व जुन्नर तालुक्याला वळवण्याच्या मागणीला विरोध करत, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलीपराव वळसे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २५ जून रोजी पत्र लिहून कुकडी प्रकल्पाशी संबंधित विषयावर बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. या बैठकीत त्यांनी मांडलेल्या मागण्यांमुळे कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होईल, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
वळसे पाटील यांनी आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी २.५५ टीएमसी पाणी कुकडी प्रकल्पातून आरक्षित करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरातील शेतीसाठी उपसा सिंचन योजनेची मागणी वळसे पाटील यांनी केली आहे. ही मागणी कुकडी प्रकल्पाच्या मूळ अहवालाशी विसंगत असल्याने, कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होईल, असे म्हटले आहे.
वळसे पाटील यांनी डिंबे ते माणिकडोह बोगदा रद्द करण्याची मागणी केली आहे. हा बोगदा झाल्यास समुद्राला वाहून जाणारे पाणी माणिकडोह धरणात येऊ शकते, ज्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
दिलीपराव वळसे पाटील यांच्या मागण्यांमुळे श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा तालुक्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, म्हणून त्यांच्या मागण्यांना विरोध करण्याची विनंती शेलारांनी दिलेल्या निवेदनात बाळासाहेब थोरात यांना करण्यात आली आहे. त्यानुसार बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करत नमूद विषयांप्रति लक्ष वेधले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






