दिनांक ५ सप्टेंबर,श्रीगोंदा:
ग्रामीण विकास केंद्र या संस्थेने गेल्या पंचवीस वर्षापासून अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना बरेच रेशन कार्ड काढून दिलेले आहेत. परंतु, ज्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाकडे रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे, आजही बऱ्याच कुटुंबांना रेशन कार्ड नाहीत.
त्यामुळे त्यांना स्वस्त धान्य दुकानात राशन मिळत नाही. असे ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेच्या निदर्शनात आले. म्हणून, या अनुसूचित जमातीतील ज्या कुटुंबांना रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांना रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र या संस्थेने बरेच पाठपुरावे करून रेशनकार्ड मोफत देण्याची संधी या समाजाला उपलब्ध करून दिली आहे.
खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास केंद्र या संस्थेला श्रीगोंदा ,कर्जत व जामखेड या अहमदनगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील आदिवासी समाजाला रेशन कार्ड मिळवून देण्याची संमती आदिवासी विकास प्रकल्पाने दिली असून, या तीनही तालुक्यात आदिवासी समाजातील एकही कुटुंब विना रेशन कार्ड राहणार नाही. अशी दक्षता संस्थेचे संस्थापक डॉ. अरुण जाधव, संस्थेचे संचालक बापू ओहोळ व आदिवासी समाजातील स्थानिक कार्यकर्ते घेणार आहेत.
रेशनकार्ड मिळवून देण्याच्या संदर्भात आज हंडाळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे ग्रामीण विकास केंद्र या संस्थेतील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली असून, पुढील नियोजन व प्रक्रिया सर्व कार्यकर्त्यांनी समजून घेतले आहे.
यावेळी संस्थेचे संचालक बापू ओहोळ, द्वारका पवार शरद काळे, तुकाराम पवार, संतोष भोसले, ज्योती भोसले, राजू भोसले आदी संस्थेचे कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते.
स्रोत:(संतोष भोसले,जिल्हा समन्वयक, लोकअधिकार आंदोलन).
