दिनांक १७ जानेवारी, श्रीगोंदा:
तालुक्यातील ५९ पैकी ५८ ग्रामपंचायतीचे मतदान नुकतेच झाले असुन, त्यापैकी ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतिक्षा असून, निकालाबाबत ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पैंजा लावल्या जात आहेत. ग्रामीण भागात गाव कट्ट्यावर, टपऱ्या, हॉटेलवर एवढेच नाही तर, पाहुण्या रावळ्यामध्ये आप – आपल्या गावांतील निकालाची चर्चा होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गुलाल आमचाच असे ठामपणे सांगत आहेत.

मतदान झाले आता, सर्वांना प्रतिक्षा आहे ती १८ तारखेच्या निकालाची. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या गावात वेगवेगळ्या चर्चा ऐकू येऊ लागल्या आहेत. सोशियल मीडियावर आपलेच उमेदवार कसे निवडुन येतील ? कोणामुळे कोण लीड घेणार ? आतुन आपल्याला कोणी मदत केली ? व त्यामुळे उमेदवार कसा जिंकणार ? हेही सध्या प्रसिद्ध केले जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यात शहराबरोबर ग्रामीण भागात निकालाबाबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या पैंजा लावल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर, घरी आलेले पै – पाहुणेही तालुक्यातील मतदान झालेल्या ग्रामपंचायतच्या राजकीय पार्श्वभूमी तसेच, निकालाबाबत स्थिती जाणून घेत आहेत. याबरोबरच कोणत्या गावात कोण जिंकणार ? हे विस्ताराने सांगत आहेत.
परंतु, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते निकाला अगोदर गुलाल आमचाच असतो ! असे छातीठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतच्या गुलालाची चर्चा तालुकाभर रंगत आहे.
स्रोत:(पत्रकार विजय मांडे)
(प्रतिकात्मक छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे.)
