दिनांक ७ जुलै २०२४, श्रीगोंदा:
मुंबई येथील गांधी भवनात दिनांक ५ जुलै रोजी राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णाजी अल्लावारू, महाराष्ट्र प्रदेश युवक प्रभारी अजयजी चिकारा, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत, आणि सह प्रभारी ऐहसान खान उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला गेला आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून चालू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली.
यावेळी इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली गेली आणि त्यांना मतदारसंघातील जनतेपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याच्या तसेच नवीन मतदार नोंदणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय प्रभारी कृष्णाजी अल्लावारू यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून युवक काँग्रेससाठी काही जागांचा कोटा ठरवून घेण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी २२६ श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी २००५ सालापासून केलेल्या कामांचा आणि पक्षावरील निष्ठेचा आढावा सादर केला. महाविद्यालयीन जीवनापासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावान राहिलेले वाबळे यांनी तालुका, जिल्हा, आणि राज्य पातळीवरील अनेक आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांच्यावर १४ केसेस दाखल आहेत.
वाबळे यांची युवक संघटनेतील पकड आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आ. सत्यजीत तांबे यांचे विश्वासू असल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी संधी देईल का.? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)





