तालुक्याच्या जडणघडणीत स्व.शिवाजीराव नागवडेंचे अतुलनीय योगदान: बाळासाहेब नाहाटा…

दिनांक १९ सप्टेंबर, श्रीगोंदा:

स्व.शिवाजीराव नागवडे हे द्रष्टे नेते होते. त्यांच्या अपार कष्ट, परिश्रम व त्यागातून ‘नागवडे’ कारखाना गेली ५५ वर्षे येथील शेतकरी, कामगार व सामान्यांची कामधेनू म्हणून काम करीत आहे. मात्र, काही सत्तालोलूप नतद्रष्ट लोकांनी स्व.बापूंचेच नाव घेत कारखान्यात धूडगूस घालण्याचा घाट घातला आहे. अशा अपप्रवृत्तींना सभासदांनी मतपेटीतून रोखणे हीच स्व.बापूंना खरी श्रध्दांजली ठरेल. असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केले आहे.

सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतकांकडून विनम्र अभिवादन..

राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना नाहाटा म्हणाले की, स्व.बापूंनी आयुष्यातील तब्बल सहा दशके तालुक्याच्या विकासासाठी खर्ची घातली.’नागवडे’ कारखान्यासह अनेक सहकारी संस्थांची ऊभारणी करुन मोठ्या कष्ट व त्यागातून त्या नावारुपाला आणण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले.

आजचा विकसीत तालुका हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे. स्व.बापूंचे विचार व वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम राजेंद्र नागवडे करीत आहेत. त्यांना भक्कम साथ देण्याची गरज आहे. कारखान्याचा कारभार सभासद, शेतकरी हिताचा व पारदर्शक असाच आहे. पण काही सत्तालोलूप मंडळी कारखान्याला पर्यायाने स्व.बापूंच्या विचारालाच विरोध करीत आहेत. कारखान्याची सत्ता हस्तगत करुन येथे धूडगूस घालण्याचा या नतद्रष्ट मंडळींचा घाट आहे. या अपप्रवृत्तीला सभासद कात्रजचा घाट दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की, स्व.बापूंची शिकवण व वारसा घेवूनच संचालक मंडळ कारभार करीत आहे. मात्र, हे काहींच्या डोळ्यात खुपत असल्याने कुरघोडी व बदनामीचे राजकारण केले जात आहे. पारदर्शक कारभारावर आक्षेप घेवून, सभासदांची दिशाभूल करण्याचा डाव या विघ्नसंतोषी सत्तालालची मंडळीनी आखला आहे. ज्यांना सभासद, शेतकरी, कामगार व सामान्य जनतेचे घेणे देणेच नाही! अशी मंडळी केवळ सत्तेवर डोळा ठेवून आकांडतांडव करीत आहेत.

मात्र, ‘नागवडे’ कारखान्याचे सभासद राजहंसासारखे आहेत. विनाकारण व दिशाभूल करणारे आरोप करणाऱ्या या चौकडीला सभासदच त्यांची जागा दाखवून देतील. असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले की, स्व.बापूंची शिकवण अंगीकारुन यापुढेही कार्यरत राहून शेतकरी, सभासद व सामान्यजनांचे जीवनमान उंचावण्याचा आपला प्रयत्न आहे.

यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.अनुराधा नागवडे, कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी स्व.बापूंच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, संचालक सर्वश्री अरुणराव पाचपुते, प्रा.सुनिल माने, अॅड.सुनिल भोस, विजय कापसे, विलासराव काकडे, योगेश भोयटे, राकेश पाचपुते, विश्वनाथ गिरमकर, सचिन कदम, राजकुमार पाटील, शिवाजीराव जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड.सुनिल सुर्यवंशी, सरपंच उदयसिंह जंगले, चांगदेव पाचपुते, विठ्ठल जंगले, निळकंठ जंगले, माजी संचालक खासेराव घाडगे, दिलीपराव काकडे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सेक्रेटरी बापूराव नागवडे यांच्यासह सभासद,शेतकरी, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या रक्तदान शिबीरात शंभरावर रक्तदात्यांनी रक्तदान केले.भाऊसाहेब बांदल यांनी सुत्रसंचालन केले. तर, वसंतराव गिरमकर यांनी आभार मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading