हंगेवाडी वडिलोपार्जित एक एकर माळरान ! खडीभर बकरी पाळून अथवा दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करणारे दगडू बाजीराव धायगुडे यांनी एक एकर डाळिब लागवड केली. डाळिंबाची रोप तयार करण्याचे तंत्र अवगत केले. धायगुडे परिवाराने श्रम आणि इमानदारीच्या बळावर पाच एकराचे बागायतदार शेतकरी झाले आहेत.
दगडू धायगुडे यांची पत्नी रेवूबाई त्यांना मच्छिंद्र व सोनबा ही दोन मुल घरची परिस्थिती नसल्याने मच्छिंद्र ने दहावीतून तर सोनबा ने पाचवीतून शाळेला रामराम ठोकला. मच्छिंद्रचा विवाह वनीताशी झाला. त्यांना दिनेश व मोहीनी ही दोन मुल सोनबाचा विवाह संगीताशी झाला त्यांना नंजय व साक्षी ही दोन मुल झाली.
परंतु या कुंटूबाने दुखाला सुख मानुन परिस्थितीचे कालचक्र बदलण्यासाठी चिकाटी आणि हिम्मत ठेवली. आढळगाव येथील डोके व कोळगावचे नलगे यांनी डाळिंब लागवड करण्याचा सल्ला दिला आणि एकरात भगवा जातीचे डाळिंब लागवड केली या बागेला शेतखत घालण्याचे धोरण घेतले दीड वर्षात बहर धरला पहिल्याच वर्षी सुमारे तीन लाखाची लॉटरी लागली.
धायगुडे परिवाराचा उत्साह वाढला बकरी पालनातुन चांगले पैसे मिळाले त्यामुळे धायगुडेंच्या चंद्रमोळीत लक्ष्मीच नांदू लागली. आणि धायगुडे यांनी चार वर्षांत चार एकर जमीन खरेदी केली. हंगेवाडीतील शुन्यातुन नव विश्व निर्माण करणारे दगडू धायगुडे म्हणून पुढे आले. दगडू धायगुडे यांनी लिंपणगाव येथील भरत बाबर यांच्याकडून डाळिंबाची रोप तयार करण्याचे तंत्र अवगत केले. गेल्या वर्षी सुमारे दहा लाखाची रोप विकली यंदाही मोठ्या प्रमाणावर रोप तयार केली आहेत. यामधून धायगुडे परिवाराला चांगला धनलाभ होणार आहे.
दगडू धायगुडे यांच्या, डोक्यावर छप्पर आहे. बसायला ना खुर्ची ना सोफासेट ! पाहुणा आला तर परातीने चहा दिला जातो. मात्र नातवांच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष दिले आहे. श्रम आणि प्रामाणिकपणाच्या पैशातून मोडक्या संसाराचा पाया भक्कम केला आहे. पुढील वर्षी टुमदार दोन बंगले बांधण्याचे नियोजन केले. छप्परातील संसार बंगल्यात स्थिरावणार आहे. त्यामुळे धायगुडे परिवरात समाधानाचे वातावरण आहे.
संदेश
हंगेवाडीत साखर कोणी उधार देत नव्हते. त्यांचा नव्हता दोष माझ्या परिस्थितीचा होता. पण मेंढरांना लक्ष्मी मानली आणि दुसऱ्याच्या शेतावर राबत राहिलो. आपल्याला काय मिळेल यापेक्षा आपल्या हातून दुसऱ्याच भल झाले पाहिजे एवढच हंगोबाला मागणं असायच पोरं हाता खाली आली, सुना आल्या गरीबी हळूहळू निघून गेली. अशा परिस्थितीत चार पैसाची बचत केली त्यामुळे चार एकर जमीन झाली. हे माझ्या स्वप्नात देखील आले नव्हते. केवळ कबाड कष्टाने चित्र बदलले आहे. भविष्यात गोर गरिब शेतकऱ्यांना मदत करून त्यांना माणसात आणणे यासाठी हातभार लावणे नाहीतरी संग काय येणार आहे. दगडू धायगुडे, हंगेवाडी.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची आहे.
