दिनांक २३ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा-काष्टी चौकातील आठ दुकाने आज पहाटे भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, यामध्ये साडी सेंटर, भेळचे दुकान, बेकरी, आईस्क्रीम पार्लर, हॉटेल आणि पान शॉपचा समावेश आहे.

या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पहाटे चार वाजता आग लागली तेव्हा काही दुकानांमध्ये मजूर झोपलेले होते. आगीची जाणीव होताच ते जागे झाले आणि त्यांनी तातडीने इतरांना माहिती दिली.

यानंतर, श्रीगोंदा साखर कारखाना आणि श्रीगोंदा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. या दुर्घटनेत सचिन कोकाटे, वाघमारे, यादव आणि इतर दुकान मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत दुकानदारांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन या घटनेची पुढील चौकशी करत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
