श्रीगोंदा.. दिनांक ४ एप्रिल २०२५:
सामाजिक समतेच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘निर्भीड कलम’ या न्यूज पोर्टलने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तीला पत्रकारितेची संधी दिली आहे. संत वाङ्मय अभ्यासक, कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ओळख असलेले समाधान महाराज नाडकर यांची पत्रकार म्हणून नियुक्ती करून ‘निर्भीड कलम’ने समाजाच्या दुर्लक्षित घटकांना हक्काचं व्यासपीठ दिलं आहे.

‘निर्भीड कलम’चे संस्थापक चंदनजी घोडके आणि अमरजी घोडके हे समाज परिवर्तनाच्या वाटचालीत आंबेडकरी विचारसरणीचा दीप घेऊन वाटचाल करत आहेत. या माध्यमातून त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेत तृतीयपंथीय व्यक्तीला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यामुळे तृतीयपंथीयांच्या समस्यांना, त्यांच्या हक्कांना आणि न्यायासाठीच्या लढ्याला आता पत्रकारितेच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळणार आहे.

या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी समाधान महाराज नाडकर व ‘निर्भीड कलम’च्या टीमचे अभिनंदन केले आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत ठवाळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, “तुमच्या निर्भीड पत्रकारितेसाठी, सामाजिक समतेच्या भूमिकेसाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक अभिनंदन.. हा निर्णय समाजाला दिशा दाखवणारा आहे.”

त्याचप्रमाणे सत्यवान शिंदे, दिपक घोडके, बंडू तात्या जगताप, अमोल डाळिंबे, पत्रकार जावेद इनामदार, संजय रणसिंग, पत्रकार संभाजी घोडके, अंबादास घोडके, नितीन जावळे, सुनील ओहोळ, भीमराव घोडके आदी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही शुभेच्छा दिल्या.

समाजातील विविध घटकांना समान वाचा मिळावी, हा ‘निर्भीड कलम’चा मूलमंत्र आहे. या निर्णयामुळे केवळ एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण तृतीयपंथीय समाजाला नव्या आशा आणि संधी मिळणार आहेत. समाधान महाराज नाडकर यांच्यासारखा अनुभवी आणि अभ्यासू व्यक्ती पत्रकारितेत आल्यामुळे या लढ्याला बळ मिळणार आहे, हे निश्चित.
स्रोत:(पत्रकार श्रीकांत ठवाळ)
