दिनांक ५ मार्च श्रीगोंदा:
सोमवारपासून राज्यभरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यां – साठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. त्यानुसार सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलल्या आहेत. जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९: ४५ वाजता कार्यालयात येण्याची वेळ असतांना,तब्बल १२० कर्मचारी उशिरा आले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी या लेट लतीफ कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
पाच दिवसांच्या आठवड्यामुळे सरकारी कार्यालयांच्या वेळा आता बदलल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९: ४५ ते सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजा ची वेळ असणार आहे.
त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरु करण्यात आली. वेळ बदलली असल्याने प्रशासनातर्फे सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांना बदललेल्या वेळेबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या.
तसेच सर्व तालुक्यांच्या पंचायत समितीतही उशिराने कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद पहिल्याच दिवशी घेण्यात आली. श्रीरामपूर पंचायत समितीत सर्वात जास्त ११ कर्मचारी उशिराने आले. अकोलेत ९, संगमनेरमध्ये ७, कोपरगाव ५, राहता ४, राहुरी ५, नेवासा ६, कर्जत ३, पाथर्डी ७, शेवगाव ५, श्रीगोंदा ५, पारनेर २, नगर ५ असे एकूण ७४ कर्मचारी उशिरा आले. या सर्वांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
(वृत्तसंस्था)
