दिनांक १४ फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा:
समाजातील अंतिम प्रवासातही माणुसकी जपली जावी आणि वंचितांना आधार मिळावा, या उदात्त हेतूने श्रीगोंदा शहरातील संकल्पनिती फाउंडेशन आणि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरासाठी ‘शवपेटी’ लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील रत्नकमल मंगल कार्यालय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. अरुण रोडे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बबनराव पाचपुते उपस्थित होते.

यावेळी बोलताना बबनराव पाचपुते म्हणाले की, “माणसाच्या आयुष्याचा शेवट गोड व्हावा, ही प्रत्येकाची भावना असते. शहरात शवपेटी असावी ही संकल्पना मांडणाऱ्या आणि ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या दोन्ही संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे.”
प्रा. बाळासाहेब बळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोन मांडत, वंचित घटकांसाठी काम करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी यावेळी नेत्रदान व अवयवदान या विषयावर प्रभावी प्रबोधन करून उपस्थितांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष सुनील कटारिया, सचिव अमर गुरव आणि राजेश परदेशी यांनी रोटरी क्लबच्या जागतिक स्तरावरील कार्याचा आढावा घेतला. समाजाच्या गरजा ओळखून राबवलेले हे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तसेच उद्योजक नवनाथ दरेकर आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेले मदन विश्वकर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अरुण रोडे यांनी संकल्पनिती फाउंडेशनच्या स्थापनेमागची भूमिका स्पष्ट केली. “ही शवपेटी समाजातील गरजूंसाठी उपलब्ध असेल आणि या माध्यमातून एक सामाजिक योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी नमूद करत शवपेटी लोकार्पण झाल्याचे जाहीर केले.
या सोहळ्याला सतीश शेठ बोरा, डॉ. अशोक खेंडके, गोपाळ मोटे पाटील, डॉ. अमित बगाडे, मेजर नवनाथ खामकर, डॉ. राजू सय्यद, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, md शिंदे, उद्योजक गुगळे, पोखरना शेठ, कदम सर, लोखंडे सर, सतीश बोरुडे, राजेंद्र उकांडे, नवनाथ दरेकर, चंद्रकांत कटारिया, डॉ. वैभव मचे, नानासाहेब कोथिंबीरे, सुजल होले, सलमान शेख, मदन विश्वकर्मा, संदीप घोडके, दिगंबर जोशी यांसह रोटरी क्लब व फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदत्त मेडिकलचे प्रोप्रा. अभिषेक दंडनाईक यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले. प्रास्ताविक अरविंद कासार यांनी मांडले, तर कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार बाळासाहेब काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
