श्रीगोंदा.. कोरोनाच्या नावाखाली डॉक्टरांचा हलगर्जीपणा.? पारगावातील धडधाकट व्यक्तीचा मृत्यू !
दिनांक २० मे (पारगाव, श्रीगोंदा):
तालुक्यातील पारगाव सुद्रीक मधील एका धडधाकट व्यक्तीचा कोरोणाच्या उपचारा दरम्यान डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत बाळासाहेब अल्हाट या मयताच्या मुलाने खुलासा केला आहे. तसेच प्रसिद्धीमाध्यमांना प्रसिद्धीपत्रक देत हा गंभीर विषय जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

वृत्त असे कि, बाळासाहेब अल्हाट यांच्या वडिलांना २९ एप्रिल २०२१ रोजी किरकोळ सर्दी व ताप जाणवला. यासाठी त्यांची टेस्ट करून घेतली. त्यात ते कोरोना पॉझिटिव निघाले. यानंतर त्यांना पारगाव येथील एका डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्यात आले. इतर काही टेस्टही करण्यात आल्या ज्या साधारण होत्या व सिटी स्कोर २ असल्यामुळे त्यांना उपचारानंतर बरे वाटू लागले होते. मात्र, शरीरात थोडा थकवा जाणवत असल्याने एक – दोन सलाईन लावण्याचे घरच्यांनी ठरवले. त्यानुसार ते श्रीगोंदा – पारगाव रोडवरील श्री. समर्थ कोविड सेंटर येथे गेले. रुग्णाने याठिकाणी जाण्यापूर्वी स्वतः आंघोळ करून, जेवण केले व मोटरसायकलवर बसून नमूद सेंटरला पोहचले. तेथे त्यांना दाखल करून घेण्यात आले. त्यांची शुगर ऑक्सिजन लेवल तपासण्यात आली. ती नॉर्मल होती. त्यांना दमही लागत नव्हता व श्वास घेण्यासही कुठला त्रास होत नव्हता. पण, गरज पडल्यास ऑक्सिजन बेड आमच्याकडे आहे. असे खात्रीने सेंटरच्या व्यवस्थापकांनी सांगितले. येथे पेशंट चांगले आणि ठणठणीत असतानाही डॉक्टरांनी अतिरिक्त प्रमाणात स्टेरॉईड इंजेक्शनच्या वापरामुळे त्यांची तब्येत अस्थिर झाल्याचे रुग्णाचे संबंधित सांगत आहेत. त्यामुळे रुग्णाची शुगर अतिरिक्त प्रमाणात वाढली. परंतु, याकडे नमूद कोविड सेंटर व डॉक्टरांनी दुर्लक्ष केले.
यानंतर वारंवार डॉक्टरांकडून त्यांना स्टेरॉईड देण्यात आले. याबाबत कुटुंबातील सदस्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. दरम्यान या औषधोपचाराने वाढलेल्या त्यांच्या शुगरकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावेळी रुग्णाच्या शरीरात वाढलेली साखर त्यांची प्रकृती अस्ताव्यस्त कर होती.
७ मे रोजी नमूद डॉक्टरांनी नातेवाईकांना फोन करून सांगितले की, आमच्याकडे ऑक्सिजन नाही. तुम्ही पेशंट शिफ्ट करा. लगबगीने या पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी नमूद रुग्णास श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. तालुका आरोग्य अधिकारी व श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना बाळासाहेब आल्हाट यांनी वडिलांचे उपचारातील सर्व कागदपत्र दाखवले. त्यानेही रुग्णाची मागील उपचारा दरम्यान शूगर वाढल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्यापासून तीन दिवसांमध्ये यांनीही शुगर, बीपी वगैरे तपासणी केली नसल्याचे नातेवाईक सांगत आहेत.
यावर पेशंटची खालावत चाललेली परिस्थिती पाहता, एका खाजगी रुग्णालयात ९ मे रोजी रात्री ११ वाजता शुगर तपासणी करण्यात आली. त्यावेळी या पेशंटची शुगर जास्त वर पोहचली होती. त्यामुळे त्यांना इन्शुलीन इंजेक्शन देण्यात आले. मात्र, शुगर आटोक्यात न आल्यामुळे बाळासाहेब आल्हाट यांच्या वडीलांचा अखेर १० मे रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. बाळासाहेब आल्हाट यांच्या वडीलांच्या मृत्यूस सर्वस्वी नमूद डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रात स्पष्ट केले आहे.
अशा पद्धतीच्या अनेक घटना तालुक्यासह आसपास परिसरात घडत आहेत. तालुक्यातील आरोग्य विभाग व डॉक्टरांचे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य माणूस दवाखान्यात भरती होण्यास भित असून, घरीच उपचार घेणे पसंत करीत आहे. अश्या दुर्दैवी घटनांमुळे सामान्य माणसाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे मत आल्हाट कुटुंबीयांनी व्यक्त केले आहे. our-father-is-gone-but-such-a-time-should-not-come-upon-many-victims-like-our-father-alhat-family
विशेष म्हणजे (तालुका आरोग्य अधिकारी) डॉक्टर नितीन खामकर यांनीही या प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा आरोप मयताच्या संबंधितांनी केला आहे. “आमचे वडील तर गेलेच. पण, त्यांच्या सारख्या रुग्णांवर अशी वेळ येऊ नये. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी व संबंधितांनी जागृत राहावे. असे आवाहन बाळासाहेब अल्हाट व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केले आहे.
स्त्रोत:(बाळासाहेब आल्हाट यांचे प्रसिद्धीपत्र)
