दिनांक २० जून,श्रीगोंदा:
कर्जत, श्रीगोंदा, आष्टी तालुक्याला वरदान ठरलेल्या निमगाव गांगर्डा येथील सीना मध्यम प्रकल्पात कुकडीच्या चालु आवर्तनातुन शुक्रवार दि १९ जून रोजी दुपारी भोसे खिंडीद्वारे पाणी सोडण्यात आले.
घोगरगाव येथील चारीत पाणी आल्याचे पाहुन शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी घोगरगावचे माजी सरपंच डाॅ. दिलीप भोस व ज्येष्ठ नेते पांडाभाऊ उगले यांच्या हस्ते तिथे जलपूजन करण्यात आले. श्रीगोंदा तालुका (विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष)अदिल शेख, सौरभ वाळके, प्रशांत भोस, संकेत उगले, शुभम शिंदे, संकेत जंजीरे, प्रदिप वाल्हेकर, चैतन्य उल्हारे व शेतकरी पुत्र उपस्थित होते. सर्वांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले असल्याचे अदिल शेख यांनी माध्यमांना सांगितले आहे.
कुकडीच्या चालु आवर्तनातुन सीना धरणात ५० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. त्यात संभाव्य गरज पाहून हे पाणी वाढविण्यात येणार असल्याचे समजते आहे. श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात अजुन मोठा पाऊस झाला नसल्याने खरीपातील पेरणी झालेल्या पिकांना कुकडीच्या पाण्याने मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
