दिनांक १३ मे(मढेवडगाव,श्रीगोंदा):
तालुक्यातील मढेवडगांव येथे पाच वर्षापूर्वी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आदर्श प्रतिष्ठान या युवकांच्या तरुण मंडळाच्या पुढाकाराने ग्रामदैवत काल भैरवनाथ महाराजांच्या यात्रेचे गाडे ओढण्याच्या मार्गावर स्मृतीवृक्ष प्रकल्पाअंतर्गत चिंच, करंज,रेन ट्री,सप्तपर्णी, बहावा,वड, पिंपळ इ.वृक्षांची लागवड केली होती. त्यातील बहावा वृक्षांना बहर आला आहे व झाडे फुलांनी लगडून गेली आहेत.
डोंगरात वाढणारा बहावा वृक्ष अत्यंत दुर्मिळ आहे. हा वृक्ष पानगळ प्रकारातील असून, साधारणपणे मे महिन्यात या वृक्षाला झुंबराच्या आकाराची फुले येतात. बहावा या वृक्षाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे.फुलं व पानांचा जीर्ण आजारात व वातशमन, शीतवीर्य, पित्तशमन,ग्रंथीशोध,वातरक्त, आमवात, संधीवात वेदनायुक्त विकारात फलमज्जा व पानांचा लेप देतात. तोंड व गळ्यासाठी फुलांचा काढा करून त्यांच्या गुळण्याने आराम मिळतो. तसेच बियांचे चूर्ण मधूमेहावर गुणकारी असल्याचे आयुर्वेद तज्ञांनी सांगीतले.
हा वृक्ष बहरल्याने ‘आदर्श गाव निर्माणचे’ प्रा. फुलसिंग मांडे, (प्रतिष्ठाणचे अध्यक्ष) विजय उंडे, अमोल गाढवे, सुनिल उंडे, अनिल उंडे, दत्ता गाढवे, सोमनाथ शिंदे, महेंद्र उंडे, संकेत शिंदे, राजेंद्र गुरव, काळूराम ससाणे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
