दिनांक: २१ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात सध्या साकळाई आणि एमआयडीसीच्या प्रश्नांवरून जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. बेरोजगारी, विकासाच्या संधींचा अभाव, आणि स्थानिक प्रश्नांनी ग्रासलेल्या सुशिक्षित तरुणांचा आक्रोश वाढत असताना, वर्षानुवर्षे काही राजकीय नेते आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा सामान्य नागरिकांतून होत आहे.

गेल्या काही वर्षांत सामाजिक व धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या घटनांवर नजर टाकल्यास, या गोष्टी पद्धतशीरपणे घडवल्या गेल्याचे दिसते. तालुक्यातील काही नेत्यांनी स्वतःचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी लोकांना चुकीच्या मुद्द्यांवर भडकवून, महत्त्वाचे प्रश्न मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रयत्न अधिकच वाढले असून, यात काही नगरसेवक आणि इच्छुक सामाजिक मंडळी सक्रिय झाले आहेत.

मागील काही वर्षांचा आढावा घेतला तर, विकासकामे श्रद्धेच्या नावावर मांडली जात असली, तरी त्यामागे श्रेयवाद आणि राजकीय स्वार्थ दडलेला असल्याचा संशय व्यक्त होत आला आहे. यापूर्वीही समाजघटकांना जातीधर्माच्या नावावर एकत्र करून, संधी साधण्याचा प्रकार घडल्याचे नागरिक सांगतात.

श्रीगोंद्यातील बहुजन ऐक्याची शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचे काम, तालुक्यात काही जातीयवादी आणि धार्मिक प्रवृत्तींकडून केलं गेले आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण होत, त्यांना चुकीच्या मार्गाकडे वळवण्याचे, माथे भडकवण्याचे प्रकार निदर्शनास आलेले आहेत.

जर या हालचालींमुळे श्रीगोंद्याचा खऱ्या अर्थाने विकास होत असेल तर स्वागतच, पण गेल्या ५० वर्षांपासून दलित अत्याचार, अल्पसंख्यांकांवरील दबाव, एमआयडीसी, साकळाई सिंचन प्रकल्प आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे. विधानसभेत आमदारांनी केलेले ॲट्रॉसिटी वरील नकारात्मक विधाने, तसेच बेरोजगारीच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा करण्याऐवजी, लोकांचे लक्ष निरर्थक मुद्द्यांकडे वळवण्याचे प्रयत्न होत आले आहेत.

तत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास..? जिल्हाधिकारी रंजन आशिया व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेऊन, संभाव्य अघटित टाळण्यासाठी तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, जमावबंदी सारखे आदेश लागू करून कायदा आणि सुव्यवस्था राखावी, शांतता समितीच्या बैठकीत समन्वय साधावा..! अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
टीप :
(श्रीगोंदा शहरात सध्या सुरू असलेल्या संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार आंदोलनाचा आणि या वरील नमूद केलेल्या बातमीतील विषयाचा कसलाही संबंध नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.)
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
