दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ अहमदनगर:
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीसपदी सतीश ओहोळ यांची बहुमताने निवड झाली. ही निवड नालंदा बुद्ध विहार, नालेगाव, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे, राज्य सरचिटणीस अशोक केदारे, राज्य संघटक गौरव पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सतीश ओहोळ हे १९९६ पासून भारतीय बौद्ध महासभेचे क्रियाशील सदस्य आहेत. त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव अशा विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.

समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव:
सतीश ओहोळ यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान प्रचारक उपक्रम, राहुल विद्यार्थी वस्तीगृहाचे समन्वय यांसह विविध सामाजिक संघटनांमध्ये महत्त्वाचे कार्य केले आहे. जिल्ह्यात सामाजिक चळवळींना चालना देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. गरीब कुटुंबांना मदत करण्याबरोबरच विवाह प्रसंगीही त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.

श्रीगोंदा येथील राहुल वस्तीगृह चालवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी स्वतः सोडविल्या आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांना या कार्यात बहुजन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उत्कर्षाताई रूपवते यांचे मार्गदर्शन व खंबीर साथ मिळत आहे.

सतीश ओहोळ यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
