श्रीगोंदा, दिनांक २६ जून २०२५ :
महाराष्ट्र शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरीब व गरजूंना देण्यात येणारे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुका व शहर कार्यक्षेत्रात समोर आला आहे. अनेक लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे तांदूळ आणि गहू स्थानिक किराणा दुकानदार व अडती व्यापाऱ्यांना विकल्याची माहिती पुढे येत असून, यामुळे सरकारी योजनेचा उद्देशच हरवला असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

प्रत्येक पात्र कुटुंबाला अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत विनामूल्य तांदूळ व गहू देण्यात येतो. मात्र, या धान्याचा थेट स्थानिक बाजारात गैरव्यवहार होत असल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे. काही किराणा दुकानांत सरकारी धान्याची विक्री होत असल्याचेही निदर्शनास आल्याचे समजते.

यामध्ये काही लाभार्थी स्वतःच हे धान्य विकून त्याऐवजी रोख रक्कम घेत असल्याचे बोलले जात असून, यात स्थानिक आडते व्यापाऱ्यांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. यामुळे गरजू लोकांना वेळेवर व पुरेसे धान्य न मिळाल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.

शासनाचे नुकसान, गरजूंवर अन्याय:
योजनेचा उद्देश म्हणजे गरीब आणि गरजूंना सवलतीत अन्नधान्य उपलब्ध करून देणे, पण हेच धान्य खुले बाजारात जास्त दराने विकले जात असल्याने सरकारी निधीचा अपव्यय होत असून, खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने या गैरव्यवहाराकडे गांभीर्याने पाहावे आणि अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)
