दिनांक २७ जुन २०२४,श्रीगोंदा:
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राहुल विद्यार्थी वस्तीगृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. राजेश पाखरे यांनी शाहू महाराजांनी सर्व जातींच्या मुला-मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी केलेल्या कार्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. पाखरे यांनी शाहू महाराजांनी कोल्हापुरात जातीनुरुप वसतीगृहे स्थापन करून शिक्षण चळवळ गतिमान केल्याचे प्रतिपादन केले.
डॉ. पाखरे पुढे म्हणाले, “शिक्षण व आरक्षनाशिवाय बहुजन समाजाची प्रगती नाही, म्हणून शाहू महाराजांनी १९०१ साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. मागास जाती-जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढून शंभर वर्षांपूर्वीच असा क्रांतिकारक निर्णय घेतला.”
शाहू महाराजांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्थापन केली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला. धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक शाळा सुरू केल्याचेही डॉ. पाखरे यांनी नमूद केले. देशातील अनेक संस्थांना, वसतीगृहांना, मुलांना शाहू महाराजांनी मदत आणि देणगी दिली.
कार्यक्रमात आनंद गांधी, उद्योजक गणेशजी गुगळे, पत्रकार पिटर रणशिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक सतिश ओहोळ यांनी केले, तर आभार रोहिदास कांबळे सर यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



