दिनांक ५ मार्च, श्रीगोंदा:
तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह शासनामार्फत उभारण्यात आले आहे. श्रीगोंद्यातील या वसतिगृहात मागील एक वर्षापासून आरोग्य विभागाकडून कोरोना बाधित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी एक वर्षापासून सदरील ठिकाण आरोग्य विभागाच्या ताब्यात होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा चढता आलेख कमी होऊ लागल्याने, पुन्हा ते वस्तीगृह खाली करून, या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती.

परंतु, काही दिवसांपासून कोरोना वर डोके काढू लागल्याने, स्थानिक प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अधिग्रहित करण्याच्या सूचना नमूद प्रशासनास दिल्या होत्या. यावर नाराज विद्यार्थी व पालकांनी काल दिनांक ४ मार्च रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर संविधानिक आंदोलन केले. मुलां, मुलींच्या सुरक्षेसह गैरसोयीबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनामध्ये ‘मातंग ऐक्य परिषदे’चे नंदू भाऊ ससाने यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यावेळी त्यांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करीत, आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी ठाम राहण्याबाबत भूमिका मांडली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मागासवर्गीयांचे प्रश्न हाताळनारे आमदार लहू कानडे यांच्याशी संपर्क साधत स्थानिक प्रशासनास धारेवर धरले.
मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी या शासकीय योजनांची अंमलबजावणी शासन करत असते. परंतु, प्रशासनाच्या माध्यमांतून शासनाच्या निर्णयांना मूठमाती देण्याचा प्रकार श्रीगोंद्यात घडत असल्याचे नंदू भाऊंनी माध्यमांना सांगितले.
दिवसभर या आंदोलनात सक्रिय राहून त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी व मांडवाची व्यवस्था करून दिली. स्थानिक प्रशासनाच्या गलथान कारभाराचा त्यांनी येथे जाहीर निषेध केला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अधिग्रहण न करता, एखादी खाजगी इमारत कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन व लेखी पत्र मिळाल्यानंतर नमूद आंदोलन थांबले.
या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जिकरीने पुढाकार घेणाऱ्या नंदू भाऊ ससाणे व मातंग ऐक्य संघटनेचे विद्यार्थ्यांसह पालकांनी आभार व्यक्त केले. यापुढेही अशा पद्धतीने शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांमध्ये येणाऱ्या अडचणींत पुढाकार घेण्याची त्यांनी विनंती केली.
या आंदोलनामध्ये भरत दिवटे, अनिल ठवाळ, सुनिल ओहोळ सह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(दिनांक ४ मार्च रोजीचे आंदोलन)
