दिनांक १५ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
प्रबोधनाचा, परिवर्तनाचा आणि चळवळीचा जो विचार आपण करतो, त्या विचारांच्या पाठीमागे असलेल्या मान्यवरांपैकी एक मुकुंदराव पाटील आहेत. असे वक्तव्य डॉ. दिनेश मुरकुटे (पुणे) यांनी “विचार प्रबोधन सप्ताहा”च्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना केले. आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी या प्रबोधन कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी उपस्थित मान्यवर उद्घाटक कॉम्रेड बाबा आरगडे, प्रमुख पाहुणे (मुकुंदराव पाटील) यांचे नातू उत्तमनाना पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ.दिनेश मुरकुटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना मुरकुटे म्हणाले की, पुण्यातील सायन पब्लिकेशनने मुकुंदराव पाटील यांचा रखडलेला प्रकल्प समग्र अग्रलेखाला पूर्ण करण्याचे काम मागील महिन्यातच संपन्न केले. आज आपल्या समोर दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या ५७ वर्षांतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अग्रलेख आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या बदलत्या स्वरूपाचं चित्रण हे अग्रलेख वाचल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचे वैचारिक घुसळण सुरू होती. याचं प्रतिबिंब त्या अग्रलेखातून पाहन्यास मिळते. असे डॉ.दिनेश मुरकुटे सर म्हणाले.

मागील पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये मी मुकुंदरावांना अग्रलेखाच्या माध्यमातून नानाकडून समजून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की, छत्रपतीनां वैदिक मंत्र म्हणण्यापासून थांबवले, एका राज्याची परिस्थिती अशी. तर, सामान्य जनतेचे काय ? असा विचार राजाच्या मनात आला. महात्मा फुले यांना अपेक्षित असलेला सत्यशोधकी, शोषणमुक्त, बंधुतेवर आधारित समाज कोणत्याही प्रकारचा दास्य, कोणत्याही प्रकारचे शोषण ज्या समाजामध्ये नाही. अशा समाजाचे स्वप्न १९व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी पाहिले होते. त्यांना सहकार्य करणारे कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, ज्योतिरावांची पत्नी सावित्रीबाई फुले हे आहेत. या विचारधारेच्या विरोधात काम करणारी एक व्यवस्था होती. जिने थेट छत्रपतींना पंचगंगेच्या स्नानांवर वैदिक मंत्र म्हणण्यास टाळले, यावर राजाच्या लक्षात आले की, राजाला जर अशी वागणूक मिळत असेल. तर, तळागाळातील सामान्यांची काय परिस्थिती असेल ? यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला दिलेल्या पाठबळामुळे सत्यशोधक पुन्हा सक्रिय झाले. या दुसऱ्या टप्प्यातील चळवळीचे प्रतिनिधित्व पत्रकार मुकुंदराव पाटील यांनी केले.असे यावेळी बोलतांना वक्ते मुरकुटे यांनी नमूद केले आहे.
अतिशय मार्मिक आणि मोजक्या शब्दांमध्ये डॉ. दिनेश मुरकुटे यांनी मुकुंदराव पाटील व तत्कालीन पत्रकारिता, त्यांचे अग्रलेख आणि वास्तविक परिस्थिती तसेच, या अग्रलेखांची माहिती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
यानंतर उत्तमनाना पाटील यांनी आपले अध्यक्ष भाषणातील मनोगत व्यक्त केले. त्यांनी अशा पद्धतीने पुरोगामी चळवळीशी होणारे कार्यक्रम सर्वत्र व्हावे, अशी अपेक्षा केली. समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा आणि कट्टर चालीरीतीबद्दल या ठिकाणी उपस्थितांना साध्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तरवडी येथील वृत्तपत्र व त्याच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती सांगितली.
याठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक बाबा आरगडे यांनीही साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये अंधश्रद्धेवर वार करीत, उपस्थित सर्वांना चळवळी बद्दल माहिती दिली. फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा ही सर्वांना तारणारी विचारधारा असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ad. संभाजीराव बोरुडे यांनी केले. तर सूत्रसंचालन संतोष इथापे व प्रदीप खामगळ यांनी केले. कार्यक्रमातील उपस्थितांचे स्वागत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा पदाधिकारी अरविंद कापसे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ त्यांच्या पत्नी आढळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अनुराधाताई ठवाळ, मच्छिंद्र काका सुपेकर, मुकुंद सोनटक्के (उद्योजक) अमीन भाई शेख (संपादक) राजू शेख, (पत्रकार) ad. महेश लोणकर, बापू माने, बबन आळेकर, काका कदम, रवि लांडगे, रफिक भाई इनामदार, संजय गायकवाड, भारत घोडके सह महिला व विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाबाबत श्रद्धांजली अर्पण करून सुरू करण्यात आली. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
स्त्रोत: (दिनांक १५ फेब्रुवारी शेख महंमद बाबा दर्ग्याच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम)
