दिनांक २५ मार्च २०२५,ठाणगेवाडी, ता. श्रीगोंदा:
येथील सरकारी गट नं. ८८ मध्ये राहणाऱ्या पारधी समाजाच्या कुटुंबावर दिनांक २४ मार्च रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास जमावाने हल्ला केला. लाकडी दांडक्यांसह आलेल्या १० ते १५ जणांच्या गटाने कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून त्यांच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली.

चिमणी शंभु चव्हाण (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या कुटुंबासह घरी असताना धनगर समाजातील काही लोकांनी अचानक त्यांच्या घरासमोर येऊन, “पारदाडांनो, तुम्ही येथे राहायचे नाही,” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ठका कोळपे याने हातातील लाकडी दांड्याने शंभु चव्हाण यांच्या पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली. ही झटापट सुरू असताना फिर्यादी आणि त्यांची मुलगी जान्हवी (वय १०) यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

याच हल्ल्यात शेजारी राहणारे चिमाजी भोसले आणि विजु भोसले यांना देखील मारहाण झाली. तसेच, निलेश कोळपे याने रोहीला भोसले यांना केसाला धरून जमिनीवर पाडत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. इतक्यावरच न थांबता जमावाने चिमणी चव्हाण आणि विजु भोसले यांच्या घराला काडीपेटीने आग लावली. तसेच, “येथून निघून गेले नाही, तर जिवे मारू,” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर चिमणी चव्हाण यांनी ठका रघु कोळपे, रामा रघु कोळपे, निलेश ठका कोळपे, बंटी रामा कोळपे, ठका कोळपेचा मेव्हाणा (सर्व रा. येळपणे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व इतर ५ ते १० जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

या घटनेनंतर चिमणी चव्हाण यांनी ठका रघु कोळपे, रामा रघु कोळपे, निलेश ठका कोळपे, बंटी रामा कोळपे, ठका कोळपेचा मेव्हाणा (सर्व रा. येळपणे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व इतर ५ ते १० जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील कारवाईसाठी अधिक तपास सुरू आहे.
स्रोत:(फिर्याद)

Advertise..
