दिनांक २४ जून २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील चवरसांगवी येथे गौणखनिज कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे आज सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
तहसीलदार यांना सादर केलेल्या निवेदनात कर्मचारी संघटनेने माहिती नमुद केली की, दिनांक २२ जून २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० ते ८.३० वाजता चवरसांगवी येथे सागर बोरुडे व त्याच्या साथीदारांनी ३ मंडळ अधिकारी व ६ तलाठी यांच्या पथकावर लाकडी दांडके व लोखंडी गजाने हल्ला केला.

दिनांक २३ जून २०२४ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे FIR दाखल केली गेली, परंतु उशिरापर्यंत आरोपींना अटक झाली नाही. जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार पोलिस संरक्षणाशिवाय कारवाई करू नये.. असे स्पष्ट निर्देश असतानाही, तहसीलदार यांनी पथकास कारवाईसाठी पाठविले. घटनेनंतर पोलिसांना बोलावूनही ते चार तासांपर्यंत आले नाहीत, ज्यामुळे हल्लेखोरांना संधी मिळाली. हल्ल्यामुळे सर्व कर्मचारी घाबरले आणि वेगवेगळ्या शेतात व खड्यात लपले. हल्लेखोरांनी पकडलेले वाहने पळवून नेले व तहसीलची शासकीय गाडी तोडली.
आरोपींना अटक न झाल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक होईपर्यंत नैसर्गिक आपत्ती व निवडणूक विषयक कामकाज वगळता इतर सर्व कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच, तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अध्यक्ष, जिल्हा तलाठी संघ, अहमदनगर, अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, अहमदनगर, उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा पारनेर विभाग, अहमदनगर यांनी सह्या केलेल्या आहेत. शिवाय यापुढील घटनांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे.
स्रोत:(निवेदन)


जाहिरात…
