दिनांक २ मार्च २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा बस स्थानकाची दयनीय अवस्था पाहून प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. सगळीकडे अस्वच्छता आणि गैरसोयींचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

बस स्थानकाच्या आवारात कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, धुळ बसलेली बाके, उघड्यावर पडलेले सांडपाणी यामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शिवाय, सार्वजनिक शौचालये अस्वच्छ असून पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. या सर्व समस्यांमुळे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेचा भोंगळ कारभार
वाहतूक नियंत्रण शाखेच्या निष्क्रियतेमुळे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रिक्षाचालक आणि खासगी वाहनांचे बेसुमार पार्किंग, यामुळे बस स्थानकाचा संपूर्ण परिसर गजबजला आहे. यामुळे बसस्थानकात बसमध्ये चढण्याआधीच प्रवाशांना जीव मुठीत धरावा लागत आहे.

विशेष म्हणजे, नागरिकांनी या समस्यांबाबत वाहतूक नियंत्रण शाखेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे आढळून येतो. आधीच अस्ताव्यस्त वाहतूक आणि त्यातच प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रशासन कधी लक्ष देणार?
नागरिक आणि प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. बस स्थानक परिसर स्वच्छ करावा, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, वाहतूक नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाहीत, तर प्रवासी आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. आता पाहण्याची गरज आहे की प्रशासन या समस्यांकडे कधी आणि किती गांभीर्याने लक्ष देते.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
