दिनांक २८ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शिवप्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदरभाव असणाऱ्या विविध समाजातील तरुणांनी तहसील कार्यालयासमोर संताप व्यक्त केला. या घटनेच्या विरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात निषेध केला असून, राज्य व केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीगोंदा शहरामध्ये दहीहंडीच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीत आणि येथे निषेध करताना, उपस्थितांची संख्या तुलनेने कमी राहिली होती. या घटनेच्या वेळी स्थानिक राजकीय नेते अनुपस्थित होते, ज्यामुळे तरुणांनी त्यांच्या प्रति तीव्र नाराजी व्यक्त केली.
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त, राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. परंतु, केवळ आठ महिन्यातच पुतळा कोसळल्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. त्यांनी निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तिकारावर आणि संबंधित विभागावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनाच्या वेळी या ठिकाणी चैतन्य ज्ञानेश्वर आजबे या चिमुकल्याने आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी हात दाखवत बॅनर वरील मोदी यांच्या तोंडाला काळे फासून या घटनेचा निषेध करण्याचा आग्रह धरला.. तर, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत घटनेचा निषेध नोंदवला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हाउपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष प्रसाद काटे, अमर घोडके, बालुदादा मखरे, परेश जाधव, गोरख तात्या घोडके, संजय रणसिंग, पवन रणदिवे, नंदू भाऊ ससाने, मयूर बनसोडे, मुकुंदजी सोनटक्के, प्रशांत शेलार, संदीप साळवे, अक्षय लोखंडे, नंदू दुर्गे, बाळू बोरुडे, संतोष गायकवाड, सुमित साळवे, अजीम जकाते, अजय शेळके, कांतीलाल कोकाटे, गणेश पारे, दिलिप लबडे, राजेंद्र राऊत, कु. चैतन्य ज्ञानेश्वर आजबे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बन यांना घटनेबाबत निषेध निवेदन सादर करत न्यायाची व कारवाईची मागणी केली आहे.
स्रोत:(निषेध आंदोलनं)





