दिनांक २८ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेवर गंभीर संशय व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या भरती प्रक्रियेत आर्थिक तडजोडी झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात आल्यामुळे शासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्याचेही आरोप आहेत.
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात, ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष संजय रणसिंग आणि उपाध्यक्ष पवन रणदिवे यांनी एका निवेदनातून स्पष्ट केले आहे की, जर या प्रकरणात पारदर्शकता ठेवून कारवाई करण्यात आली नाही, तर दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
या आंदोलनासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके हे मार्गदर्शन करणार असुन, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि पारदर्शकतेसाठी लोकांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात या भरती प्रक्रियेवरून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात असून, या मुद्यावर पुढील काळात मोठे राजकीय आणि सामाजिक आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्रोत:(निवेदन)





