दिनांक ३ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. याबाबत श्रीगोदा आगार व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या पत्रात संघटनांनी दिनांक ३ सप्टेंबर २०२४ पासून धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.
संदर्भानुसार, ९ ऑगस्ट २०२४ रोजी एसटी कामगार सयुक्त कृती समितीने आंदोलनाची तयारी दर्शवली होती. त्या वेळी राज्य सरकारने सकारात्मकतेने हस्तक्षेप करत मागण्यांच्या सोडवणुकीचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र, सरकारच्या वागणुकीतून निव्वळ वेळकाढू धोरणाचे दर्शन झाले असून, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा एकदा धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
एसटी कामगार संघटनांनी सरकारला यापूर्वीच धरणे आंदोलनाची नोटीस दिली असून, राज्यभरातील सर्व विभाग, आगार व युनिटसमोर हे आंदोलन होणार आहे. श्रीगोदा आगार व्यवस्थापकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांच्या आगाराच्या गेटसमोर हे धरणे आंदोलन करण्यास परवानगी द्यावी.
महत्वाच्या मागण्या व अन्य प्रश्नांवर उपाययोजना केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत चालू राहणार असल्याचे एसटी कामगार सयुक्त कृती समितीने स्पष्ट केले आहे. कर्मचारी वर्गाच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
स्रोत:(आंदोलन)







